मुख्यमंत्री गेहलोत यांच्या धावपट्टीवर सचिन पायलट

जयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि बंडखोर नेते सचिन पायलट गुरूवारी परस्परांना भेटले.
जयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि बंडखोर नेते सचिन पायलट गुरूवारी परस्परांना भेटले.

जयपूर - राजस्थानातील काँग्रेसचे सत्तासिंहासन डळमळीत करणाऱ्या मुख्यमंत्री  गेहलोत विरुद्ध पायलट गटाच्या संघर्षाला आज पूर्णविराम मिळाला. राज्यविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये दिलजमाई झाली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उभय नेत्यांनी परस्परांशी हस्तांदोलन करताना यापूर्वीच्या सर्व वादांना तिलांजली दिली. पायलट यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे बळ वाढले असून गेहलोत यांनी आज आम्हीच स्वतः विधिमंडळात विश्‍वासदर्शक ठराव मांडणार आहोत असे सांगितले.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनास उद्यापासून (ता.१४) सुरूवात होत असताना भाजपने पहिल्याच दिवशी राज्य सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते गुलाबचंद कटारिया यांनी दिली. आज येथे पार पडलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंडाचे शस्त्र उपसणाऱ्या आमदार भंवरलाल शर्मा, विरेंद्रसिंह यांच्याविरोधातील निलंबनाची कारवाई पक्षाने रद्द केली आहे. मागील महिन्यात या आमदारांवर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. पक्ष नेतृत्वाने विचाराअंती शर्मा आणि विरेंद्रसिंह यांच्याविरोधातील निलंबनाची कारवाई रद्द केली असल्याचे पक्षाचे सरचिटणीस अविनाश पांडे यांनी सांगितले. राज्यातील गेहलोत यांचे सरकार पाडण्याच्या कारस्थानामध्ये या मंडळींचा सहभाग असल्याची बाब उघड झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.

त्या आमदारांच्या अडचणी काय
काँग्रेसवासी झालेल्या बहुजन समाज पक्षाच्या सहा आमदारांसमोरील कायदेशीर अडचणी अद्याप कायम आहेत. या आमदारांच्या पक्षांतराला आव्हान देणारी याचिका भाजपचे आमदार मदन दिलावर आणि बसपकडून सादर करण्यात आली असून यावर आज एकसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणातील दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुनावणी उद्यापर्यंत (ता.१४) पुढे ढकलली.

सर्व काही व्यवस्थित आहे. आता काँग्रेस कुटुंब पुन्हा एक झाले आहे. आम्ही भाजपच्या दुष्ट राजकारणाविरोधात लढू. उद्या विधानसभेत काँग्रेस एकदिलाने उपस्थित असेल. 
- के. सी. वेणूगोपाल, काँग्रेस सरचिटणीस

जे झाले ते विसरुन जाऊ. १९ आमदारांविनाही आम्ही बहुमत सिद्ध केले असते, मात्र आनंद नसता वाटला. आपले अखेर आपलेच असतात. प्रत्येक आमदाराची तक्रार आता किंवा नंतर दूर केली जाईल.
- अशोक गेहलोत, मुख्यमंत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com