इंचभरही जमीन गमावलेली नाही - राजनाथसिंह

rajnath singh
rajnath singh

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील पॅन्गाँग सरोवराच्या परिसरात आमनेसामने आलेल्या चीन व भारताच्या लष्करी तुकड्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली आहे. ही माघार टप्प्याटप्याने होणार आहे व चीनचे सैनिक ‘फिंगर-८’ टेकड्यांच्या मागे जातील व भारतीय जवान ‘फिंगर-३’ टेकडीजवळील आपल्या स्थायी जागांवर येतील, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज राज्यसभेत सांगितले. भारत आपली एक इंच जमीनही इतर देशाला घेऊ देणार नाही तसेच या वादात इंचभर जमीन देखील आम्ही गमावलेली  नाही असा दावा करून राजनाथसिंह म्हणाले की, ‘भारताच्या या दृढ संकल्पाचाच हा परिणाम आहे की आम्ही पूर्व लडाखमध्ये चीनबरोबरच्या सरहद्दीवर पूर्व परिस्थिती बहाल करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर पोहोचलो आहोत.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हा तिढा चर्चेद्वारे  सोडविण्याच्या भारताच्या राजनैतिक प्रयत्नांना आलेले हे यश मानले जाते. गलवान खोऱ्यातील भारतीय हद्दीत घुसखोरी करून चीनने कुरापत काढल्यानंतर गेल्या ९ महिन्यांपासून धुमसणारा भारत-चीन सीमा वाद आता निवळू शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

भारताचे तीन सिद्धांत
राजनाथसिंह यांनी संसदेत केलेल्या निवेदनात सांगितले की, भारत तीन सिद्धांताच्या आधारावर सीमा विवादाचा तोडगा निघेल असे मानतो. १) दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) मान्य करणे व त्याचा सन्मान करणे २) कोणत्याही देशाने परिस्थिती बदलण्याचा एकतर्फी व परस्पर प्रयत्न न करणे  ३) सरहद्दीबाबतच्या सर्व द्विपक्षीय करारांचे दोन्ही देशांनी पालन करणे.

तोपर्यंत वाटाघाटी सुरू राहणार
राजनाथसिंह म्हणाले की, ‘‘ चीनबरोबर भारताने ९ सप्टेंबर २०२० पासून ताज्या विवादावर सातत्याने द्विपक्षीय वाटाघाटी सुरू ठेवल्या आहेत. सीमा विवादासह परस्पर वादाचे मुद्दे वाटाघाटींद्वारेच सुटू शकतील हे भारताने चीनला कायम सांगितले आहे. त्यातूनच आता पॅन्गाँग तळ्याच्या दक्षिण काठावरून दोन्ही सैन्यांनी माघार घेण्याची तयारी दर्शविली आहे. दोन्ही देश आपापले सैन्य कालबद्ध पद्धतीने मागे घेतील. एलएसीजवळच्या भागात चीनने अनेक ठिकाणी सशस्त्र सैनिकांसह दारूगोळा, शस्त्रास्त्रे व लढाऊ वाहनांची संख्या वाढविली. आम्हीही या भागात तेवढ्याच प्रभावी पद्धतीने सैन्याची तैनाती केली आहे. दोन्ही देशांतील तणाव निवळेपर्यंत व सीमेवरील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत वाटाघाटी चालूच ठेवाव्यात असे भारताचे मत आहे.’’

सार्वभौमत्वाबाबत तडजोड नाहीच
चीनने लडाखच्या अनेक भागांवर १९६२ पासून अनधिकृत पद्धतीने कब्जा केला होता. पाकिस्ताननेही चीनला आमची जमीन दिली आहे. भारताच्या एकूण ४३ हजार वर्ग किलोमीटरवर चीनने बेकायदा कब्जा केला आहे व त्यातून भारत व चीनमधील संबंधांवर परिणाम झाला आहे. देशाच्या सार्वभौमत्वाबाबत भारत  तडजोड करणार नाही, असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com