राष्ट्रहिताच्या नजरेतून : निष्क्रिय विरोधक

कोलम: कॉंग्रेस नेते राहुल गांधी मार्गदर्शन करताना.
कोलम: कॉंग्रेस नेते राहुल गांधी मार्गदर्शन करताना.

घटनात्मक संस्थांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर, अन्यायकारक कायदे, देशद्रोहाच्या कायद्याचा उठसूट वापर, एकतर्फी होणारे कायदे याबद्दल तक्रारी करू शकतो. मात्र, विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षाची या मुद्‌द्‌यावरची निष्क्रियता मोठा प्रश्‍न आहे. 

मोदी सरकारला न आवडणाऱ्या गोष्टी सांगण्याची धमक पत्रकारांमध्ये आहे का, यावर या आठवड्यात चर्चा रंगली. मात्र केंद्र सरकारला माध्यमांचा धाक अजूनही वाटतो, हे मात्र निश्‍चित आहे. कोरोना संसर्गाच्या कठीण काळात, जून महिन्यात ९ महत्त्वाचे मंत्री सदस्य असलेला मंत्रिगट मीडियाच्या नकारात्मक बाजूला रोखण्यासाठी बैठकांवर बैठका घेत होते. एकीकडे गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय संघर्षामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, तर दुसरीकडे देश कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सत्तेवर कुठलाही पक्ष असो, सरकारला प्रश्‍न विचारणे पत्रकारांसाठी कधीच सोपे नव्हते. सध्या या अडचणीत जरा जास्त वाढ झाली आहे, असे म्हणता येईल. मात्र पत्रकारांचा हा नेहमीचा अनुभव आहे. याला दुसरा पर्याय म्हणजे स्वतःला कुठल्या तरी पक्षाचा रंग लावून घेणे. सध्या पत्रकारांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे. म्हणजे सरकारकडे बोट दाखवले तर तुमच्या वाट्याला टीका, टोमणे येतात. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षावर टीका केल्यास त्यांचे शाप सहन करावे लागतात. सरकारला सोडून केवळ विरोधी पक्षावर प्रहार करणे हीच का ती मुक्त प्रसारमाध्यमांची जबाबदारी, असा जळजळीत प्रश्‍न तुम्हाला सहन करावा लागतो. याच कारणामुळे गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षांवर टीका करणे टाळत होतो. कॉंग्रेस पक्ष किंवा राहुल गांधी यांच्याबद्दल फारसे नकारात्मक,  टीकात्मक मी लिहिले नाही. मात्र राहुल गांधी यांची घसरण, आळस वाढत चालला आहे. मला प्रश्‍न उपस्थित करायचा आहे, घटनात्मक संस्थांचे महत्त्व कमी करण्याचा, तपास यंत्रणांचा गैरवापर, धार्मिक आणि सामाजिक हितांना बाधा पोहोचवणारे कायदे, पार्किंग तिकिटांसारखे देशद्रोहाचे गुन्हे तुमच्यावर थोपले जाताहेत. संसदेत एकतर्फी कायदे आणले जाताहेत. मंत्रिगटसुद्धा माध्यमांवर अजेंडा तयार करत आहेत. मात्र, जर कॉंग्रेसकडे लोकसभेत १०० जागा असत्या किंवा यूपीएचे १३० ते १५० खासदार असते, तर केंद्र सरकार हे करू शकले असते का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

टीका विरोधकांच्या जिव्हारी 
१९८४ च्या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये राजीव गांधी यांना दणदणीत बहुमत मिळाले होते. त्या वेळी ते विरोधकांना १०+२+३ असे चिडवायचे. त्या वेळी जनता पक्षाला १०, भाजपला २ तर लोकदलाला ३ जागा मिळाल्या होत्या. ते म्हणायचे, आम्ही विरोधकांसाठी १०+२+३ ही व्यवस्था जाहीर केली आहे. मात्र राजीव गांधींची ही टीका विरोधकांच्या खूप जिव्हारी लागली व काही महिन्यांत जखमी विरोधक राजीव गांधी सरकारवर तुटून पडले. त्यांच्याकडे ५३० पैकी ४१५ जागा असूनही, विरोधकांनी अनेक मुद्‌द्‌यांवर राजीव गांधींना घेरले.

वाढती बेरोजगारी, इंधन दरवाढ ते घटनात्मक संस्थांना कमजोर करणे, अल्पसंख्याकांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले चढवण्यापर्यंतच्या कितीतरी महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांवर विरोधी पक्ष कुठे आहे, ते काय करताहेत, भाजपसोबत तुलना केल्यास, राजीव गांधी सरकारच्या काळात, लोकसभेत दोन खासदार असणारा भाजप दिवसाला जंतरमंतरवर निदर्शने करत असायचा. आजचा विरोधी पक्ष फक्त संतप्त होऊन ट्विट करतो. केरळमधील राहुल गांधी यांचे मच्छीमारांसोबत पोहतानाचे प्रसारित झालेले छायाचित्र बघून विरोधी पक्षावर प्रश्‍न उपस्थित न करण्याचा माझा संकल्प मी मोडला. राहुल गांधी समर्थकांनी त्यांची सिक्‍स पॅक बॉडी, त्यांच्या पुश अप्सवर तोंडभरून कौतुक करण्याचा एकच सपाटा लावला. मात्र हे क्षण/छायाचित्रे क्षण खरेच व्हायरल करण्याच्या योग्यतेचे होते का, या छायाचित्रामुळे त्यांच्या पक्षाला मते मिळणार आहेत का, हा प्रश्‍न का विचारू नये?

चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांना हा पक्ष सामोरे जातो आहे आणि या पक्षाचा प्रमुख शाळकरी मुलांना स्वतःचा शारीरिक फिटनेस दाखवतो आहे. ते किती प्रभावित झाले मला माहिती नाही; मात्र ५० वर्षांच्या नेत्याने या शाळकरी मुलांना मसल पॉवर दाखवून हैराण करावे?  या नेत्याच्या पक्षाला आग लागली आहे. पक्षाचे बंडखोर नेते ज्यांना ‘जी २३’ गट म्हटले जाते, यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी कुटुंबाच्या जवळच्या नेत्यांचा समावेश आहे. हे नेते जम्मूमध्ये जाहीर बैठका घेऊन पक्षावर तोफ डागताहेत. 

राहुल गांधी यांनी २०१९ च्या पराभवानंतर पक्षाचा राजीनामा दिला. या पक्षाचा कारभार कायमस्वरूपी अध्यक्षाविना सुरू आहे. आजारी सोनिया गांधी यांना जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे. अजून अध्यक्षपदासाठी निवडणुका होताना दिसत नाहीत आणि यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केल्यावर तोच प्रतिप्रश्‍न पत्रकारांना विचारला जातो. भाजपमध्ये निवडणुका होत नाहीत, हा प्रश्‍न त्यांना कुणी विचारत का नाही? हा चांगला प्रश्‍न आहे, मात्र भाजपला किमान अध्यक्ष तरी आहे. गांधी कुटुंब अध्यक्षपदावर परतल्यानंतर गेल्या २५ वर्षांत भाजपचे ९ अध्यक्ष बदलले. 

मी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे काय मिळतील, याची मला कल्पना आहे. जी-२३ गटाला काय किंमत आहे, त्यांना जनाधार कुठे आहे, ते एक तरी जागा जिंकू शकतात का, त्यांना राज्यसभा हवी किंवा सत्तेत नसल्यामुळे त्यांची धडपड सुरू आहे, राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरा अध्यक्ष सांगा जो पक्षाला एकसंध ठेवू शकतो. देशात भाजप आणि संघाला टक्कर देणारा दुसरा नेता कोण आहे, हे सर्व मुद्दे योग्य आहेत. मात्र ते पक्षाचे अध्यक्ष असताना, पक्षाची पुनर्बांधणी केल्याशिवाय पक्ष कसा टिकणार आहे? निराशेमुळे अजून किती ज्योतिरादित्य शिंदे पक्ष सोडणार आहेत? तुम्ही मते गमावत आहात. ही मते शरद पवार, अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाकडे जाण्यापासून तुम्ही कसे रोखू शकता? 

मजरूह साहेब मला माफ करा!
केरळमधून प्रसारित झालेल्या व्हायरल व्हिडीओवरून मला १९७४ मधील दिलीप कुमार-सायरा बानू यांच्या ‘सगीना’चे एक गाणे आठवले. गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांनी हे गीत लिहिले. त्यांनाही माहिती नसेल की हे गाणे राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाच्या आजच्या परिस्थितीवर चपखल बसणार आहे. गाण्याचे बोल होते, ‘आग लगी हमारी झोपड़िया में हम गावें मल्हार... देख भाई कितने तमाशे की जिंदगानी हमार...' मजरुह साहेब मला माफ करा, मी गीताचे हे बोल चोरतोय. मात्र मी राहुल गांधी यांची माफी मागणार नाही. कारण हे गाणे त्यांच्यासाठी लिहिले गेले आहे.

(अनुवाद: विनोद राऊत)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com