संकटाच्या काळातही रेल्वेची यशोगाथा

Indian-Railway
Indian-Railway


नवी दिल्ली - भारतीय नगारिकांची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचा या वर्षातील बहुतांश काळ यार्डातच गेला. रेल्वेशिवायचे जीवन भारतीयांनी या काळात अनुभवले. केंद्र सरकारने २४ मार्चला टाळेबंदी जाहीर केली आणि आपल्या १६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच रेल्वेला आपल्या सर्व सेवा बंद कराव्या लागल्या. 

रेल्वेसेवा बंद असल्याचा थेट आणि मोठा फटका स्थलांतरीत मजूरांना जाणवला. एरव्ही आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये गर्दी करणाऱ्या या मजूरांना अक्षरश: शेकडो किलोमीटर रस्ता तुडवत जावे लागले. प्रवासबंदी जाहीर होताच रेल्वेने लाखो आरक्षित झालेली तिकीटे रद्द केली. हा प्रकार रेल्वे अधिकाऱ्यांसाठीही नवा आणि धक्कादायक होता.  अर्थात, या काळातही ‘श्रमिक रेल्वे’ने अनेकांना घरी सुखरुप पोहोचविले, अनेक महिलांची बाळंतपणेही पाहिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१ मे पासून ३० ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत रेल्वेने चार हजार फेऱ्यांद्वारे २३ राज्यांमधील जवळपास ६३.१५ लाख कामगारांना घरी पोहोचविले. रेल्वेचे कामकाज मंदावले असेल, पण रेल्वे हीच अद्यापही भारतीयांची जीवनवाहिनी आहे, हेच यातून सिद्ध झाले. तोट्यात जात असूनही रेल्वेला या प्रवासी वाहतूकीसाठी दोन हजार कोटी रुपये खर्च आला. इतकेच नाही, तर रेल्वेच्या डब्यांचा विलगीकरण केंद्र म्हणूनही वापर करण्यात आला.

सध्याची रेल्वे सेवा
१०८९ - विशेष रेल्वे गाड्या
८८ टक्के क्षमतेने - मुंबई उपनगरीय सेवा
६० टक्के क्षमतेने - कोलकता मेट्रो सेवा
५० टक्के क्षमतेने - चेन्नईची उपनगरीय सेवा

माझ्या दृष्टीने रेल्वे म्हणजे आशा, आनंद आणि जीवनचक्राचे प्रतीक आहे. मी गेली २५ वर्षे एकाच रेल्वे मार्गाने बिहारमधील माझ्या घरी जात आहे.  
- जितेंद्र कुमार, नोएडामधील सुरक्षा कर्मचारी

या अडचणीच्या काळातही रेल्वेने कौतुकास्पद कामगिरीही केली आहे. या काळात आमच्या कर्मचाऱ्यांमधील खरी क्षमता आम्हाला समजली. 
- व्ही. के. यादव, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष

रेल्वेने घडविले बदल
कोरोना काळात रेल्वेने संकटाचे संधीत रुपांतर करत स्वत:मध्ये बदल घडवून आणले. त्यांनी दूध, औषधे आणि व्हेंटिलेटर या अत्यावश्‍यक पदार्थ-वस्तूंची वाहतूक करण्यासाठी पार्सल सेवा सुरु केली. रेल्वेच्या प्रत्येक विभागात उद्योग विकास केंद्रे उभारण्यात आली. विश्‍वासार्हता वाढविण्यासाठी रेल्वेने पार्सल सेवेचे वेळापत्रकच जाहीर केले.  रेल्वेने आठ किसान रेल्वे सुरु करत शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीसाठी देशभर पाठविण्यासही मदत केली. 

मालवाहतुकीवर भर
सप्टेंबर महिन्यात रेल्वेने तब्बल १०२ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. पुढील दोन महिन्यांमध्ये यामध्ये १५ टक्के आणि ९ टक्के अशी वाढच झाली. प्रवासी रेल्वे गाड्या रुळावर नसल्याने मालवाहतूक गाड्यांचा वेग वाढविण्यात आला. गेल्या वर्षी दर तासाला २४ किलोमीटर अंतर जाणाऱ्या गाड्या या वर्षी ४६ किमी वेगाने धावल्या. याच काळात रेल्वेने ३५० अवघड आणि प्रलंबित पुलांची कामे पूर्ण केली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com