Taj Mahal: ताजमहाल कोणाचा? मुघलांचा की राजपुतांचा?

ताजमहल की तेजोमहल? याप्रकरणावरून सध्या वातावरण तापलेलं आहे.
Tajmahal
TajmahalSakal

मुमताज महल चौदाव्या अपत्य जन्माच्या वेळेस १७ जुन १६३१ रोजी बु-हाणपूर येथे वारली. दारा शुकोह, औरंगजेब ते शाहजहानची लाडकी लेक जहानाअरा बेगम ही तिची आजही इतिहासात स्थान मिळवून बसलेली अपत्ये. बु-हाणपूर येथे तिला तात्पुरते दफन करण्यात आले. आग्र्यात तिच्यासाठी कायमच भव्य मकबरा बनवायची योजना असल्याने शाहजहानने राजा जयसिंगाकडून यमुनाकाठची त्याची हवेली चार हवेल्यांच्या मोबदल्यात विकत घेतली. शाहजहानच्या फर्मानात व कझ्विनी व लाहोरीच्या पातशहानाम्यात या व्यवहाराचा, ही जागा घेण्यामागील हेतुचा, म्हणजे भव्य व शानदार मकबरा बांधण्याचा, स्पष्ट उल्लेख आहे. ही जागा ४२ एकरात असून त्यात निवासी हवेली (मंझिल किंवा खाना) होती असेही त्यावरुन दिसते. याच जागेवर ताजमहालचे बांधकाम करण्यात आले की जुन्या वास्तुलाच सुशोभीकरण करुन फक्त नाव बदलण्यात आले याबद्दल मोठा विवाद आहे.

पु. ना. ओक, भट-आठवले प्रभुतींनी मानसिंगाच्या मुळच्याच बांधकामाला संगमरवरी आच्छादन देत ताजमधे बदलवले अशा अर्थाचे निष्कर्ष काढले आहेत. ओकांच्या मते तर तेथे तेजोमहालय नांवाचे शिवालयच होते. या वादाला तेंव्हापासून सुरुवात झाली तो आजही शमायला तयार नाही. त्यात जायचे येथे कारण नसून आपल्याला मुळात ताजमहाल ही काही डागडुजी करुन मुळच्याच इमारतीचे सुशोभीकरण आहे की संपुर्ण ताजमहाल नव्याने बांधला गेला याची येथे चर्चा करायची आहे.

याबद्दल शंका नाही की ताजमहालाची जागा मुळची राजा मानसिंगाच्या मालकीची होती. यमुनेच्या दोन्ही काठांवर राजपुत्र आणि सरदारांच्या हवेल्या होत्या. १६२६ मध्ये डच अधिकारी पेलासर्ट आणि डलात यांनी मानसिंगाच्या हवेलीचा उल्लेख करून ठेवला आहे. ताजची जागाही तीच आहे हेही १७०७ मधील एका नकाशावरुन व पेलासर्टने दिलेल्या यादीशी तुलना करुन स्पष्ट होते. फर्मान आणि पातशहानामाही या माहितीला पुष्टी देतो. या पुराव्यांवरून एकच गोष्ट सिद्ध होते व ती म्हणजे ताजची जागा आधी जयसिंगाच्या नावे होती, त्या जागेचा मुळ मालक मानसिंग असून तेथे एक हवेली अथवा मंझील होती. या बाबी नाकारण्याचे काही एक संयुक्तिक कारण नाही.

मानसिंग हा बादशाही दरबारातील बलाढ्य हस्ती होते. त्यामुळे त्यांची हवेली आग्र्यात असणे स्वाभाविक होते. जेव्हा शाहजहानने हवेली ताब्यात घेतली तेंव्हा राजा जयसिंग मात्र स्वत: त्या हवेलीत रहात होता की नाही याचे मात्र कसलेही उल्लेख मिळत नाहीत. शाहजहानने राहती हवेली विकत मागितली असती काय किंवा जयसिंगाने विकली असती का या प्रश्नाचा कोणी इतिहासकाराने विचार केलेला दिसत नाही.

शाहजहानला यमुनाकाठच्या त्या ४२ एकरांच्या जागेत रस होता, त्याच्या हवेलीत नाही हेही फर्मान व पातशहानाम्यावरून सहज लक्षात येते. शिवाय त्या जागेवर अद्वितीय वास्तुचे अस्तित्व असते तर पेलासर्ट व डलातने तिचा तसा उल्लेख केला असता. पण तसेही नाही. अन्य राजपुत्र व सरदारांच्या हवेल्यांच्या जागांचे ते जसे वर्णन करतात तसेच मानसिंगाच्या जागेचेही वर्णन करतात. वास्तूरचनाशास्त्र दृष्ट्या ती विशेष वेगळी इमारत असती तर तिचा वेगळा उल्लेख येणे व ती तेव्हाही, भलेही संगमरवरी आच्छादन नसले तरी, तत्काळी प्रसिद्ध इमारत असती. पण ते वास्तव नाही. ती एक निवासी पण एक दुर्लक्षीत हवेलीच होती एवढेच काय ते वास्तव अनेक पुराव्यांवरुन पुढे येते.

Tajmahal
सोलापुरात आजीआजोबा लग्नबंधनात; 61 वर्षांचं प्रेम फुललं

त्यामुळेच की काय राजा मानसिंगच्या हवेलीचेच ताजमध्ये रुपांतरण करण्यात आले असा उल्लेख कोठेही मिळत नाही. मानसिंगाची तत्कालीन प्रसिद्धी पाहता जर असे झाले असते तर कोठे ना कोठे त्याचे उल्लेख मिळाले असते. शिवाय पातशहानाम्यातील नोंदी या मताला कसलीही पुष्टी करत नाहीत.

पातशहानाम्यातील या संदर्भातील जे उतारे आहेत त्याची वेगवेगळे अनुवाद प्रसिद्ध आहेत. माझे मित्र आनंद दाबक यांनीही एका स्वतंत्र पर्शियन अनुवादकाकडून अनुवाद करून घेतला होता व अन्य अनुवादही तज्ञांकडून तपासून घेतले होते. तो अनुवाद आणि ओकांनी दिलेला अनुवाद याची तुलना करता हे लक्षात येते की ओकांनी आपल्या अनुवादात मोठा घोळ घातला आहे. मुळात पातशाहनाम्यात "प्रकल्पाच्या सदस्यांनी या इमारतीला चाळीस लाख रुपये खर्च येईल असा अंदाज केला." राजेंद्र व्ही जोशी यांनीही ओकांचा अनुवाद तपासून त्यात चूक आहे असे स्पष्ट केले होते. उदा. ( members of project team ) budgeted / estimated the cost ( Rs forty lacs) अशा अर्थाचे वाक्य असतांना ओकांनी "Far-sighted engineers and skilled architects expended forty lakhs of rupees [Rs.4,000,000] on the construction of this building." असा अर्थ घेतला आहे. या ओकांच्या अर्थामुळे असा समज निर्माण होतो की १६३३ मधेच ताजचे बांधकाम पुर्णपणे तयारच होते व डागडुजीसाठीच तो काय चाळीस लाख रुपये खर्च आला. म्हणजे अंदाजित खर्च आणि होऊन गेलेला खर्च यातील फरक, बहुदा जाणीवपुर्वक करत, त्यांनी आपला सिद्धांत मांडला.

Tajmahal
बुद्ध, जैन, बसवेश्वर यांनी आधी विद्रोह केला मग...; आव्हाडांची पवारांना पाठराखण

याचा अर्थ असा की मानसिंगाच्या हवेलीचे रुपांतर डागडुज्या करुन सध्याच्या ताजमधे करण्यात आलेले नाही. मग मानसिंगाच्या हवेलीचे काय झाले? अर्थात या प्रश्नाच्या उत्तराकडे वळण्याआधी आपण ताजसंबंधी उपलब्ध असलेली अन्य माहिती तपासून पाहुयात.

१. फ्रेंच व्यापारी टॅव्हर्नियर हा १६३८ ते १६६८ या काळात सहा वेळा भारतात येऊन गेला. ताजमहालवर २०,००० कामगार काम करत होते आणि ते पुर्ण व्हायला २२ वर्ष लागली ही माहिती तो देतो.

२. फ्रे सबास्टियन मनरिके हा पोर्तुगीज मिशनरी डिसेंबर चाळीस ते जानेवारी ४१ या काळात आग्र्यात होता. तो या बांधकामावर एक हजार लोक काम करीत होते असे लिहितो. हे लोक रस्ते, बागांचे काम करीत होते असे तो लिहितो.

३. पीटर मुंडी हा ब्रिटिश व्यापारी १६३१ ते १६३३ या काळात आग्र्याला तीन वेळा राहिलेला आहे. त्याला मुमताजचा मृत्यू झाल्याचे माहित होते. शेवटच्या भेटीच्या वेळीस त्याने जे पाहिले ते लिहिले आहे ते असे “ This Kinge is now buildinge a Sepulchre for his late deceased Queene Tege Moholl..... He intends it shall excell all other. The place appoynted is by the river side where she is buried, brought from Burhanpur where she dyed accompanying him in his wars." (पान २१२,The Travels of P Mundy, Volume II Travels in Asia, edited by Lt Col Sir R C Temple,) आणि याच माहितीच्या पुढे तो लिहितो की बांधकाम सुरु झाले असून अत्यंत मोठ्या प्रमाणावर कामगार व धन वापरले जात आहेत. संगमरवर जणू एखादा सामान्य दगड असावा एवढ्या विपुलतेने वापरला जात आहे.

टॅव्हर्नियर आग्र्याला मात्र केवळ दोन वेळा आला होता. पहिली आग्रा भेट १६४०-४१ चे तर दुसरी १६६५ची. म्हणजे त्याने बांधकाम चालू असलेले पाहिले ते फक्त एकदा. बाकी जी माहिती त्याच्याकडे आहे ती सांगोवांगीची आहे हे उघड आहे. त्यामुळे २० हजार कामगार व २२ वर्ष ही एकतर अतिशयोक्तीत टाकून देता येतात किंवा त्याचा केवळ एक अंदाज म्हणून सोडून देता येतात. मनरिकेबद्दलही तसेच म्हणता येते व मुंडीबाबतही. मुळात हे प्रवासी नव्हते तर व्यापारी होते. बांधकाम सुरु असतांना एखादी इमारत पुर्ण झाल्यावर कशी दिसेल याची कल्पना येण्याची शक्यता नाही. त्यामुळे कामगार संख्या अचूक का नाही, खर्चाचा ताळमेळ मग कसा बसत नाही याची गणिते अशा वर्णनांच्या आधारे करत मते मांडणे गैर आहे. तेथील कामगार इतकी वर्ष जुन्या वास्तुचीच डागडुजी करत असते तर मुंडीपासून असे उल्लेख सुरु झाले असते. पण तसे वास्तव नाही.

वरील उल्लेखांवरून, फर्मानांवरून आणि या लेखकांच्या वर्णनावरुन एकच गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे ताजमहालाच्या जागेवर नव्याने बांधकाम चालू करण्यात आले होते व त्यासाठी अनेक मजूर, अभियंते आणि वास्तुतज्ञ राबत होते.

Tajmahal
अकबरुद्दीन ओवैसींनी घेतलं औरंगजेबच्या कबरीचं दर्शन; वादाची शक्यता

मग मानसिंगाच्या मुळ वास्तुचे काय झाले? काही इतिहासकारांच्या मते शाहजहानने जयसिंगाकडून फक्त "जमीन" घेतली होती. जमीन की मंजील याबाबत वाद झडला आहे. तेथे मंजिल अथवा हवेली असण्याचीच शक्यता आहे. ही हवेलीत त्या काळात कोणी रहात असल्याची शक्यता नाही. कदाचित त्यामुळेच शाहजहानने ही जागा मागितली. जयसिंगानेही खळखळ न करता ही जागा देऊन टाकली व अन्यत्र चार हवेल्या मिळवल्या. मानसिंगाची हवेली ताजसारखी भव्य व सुंदर वास्तू नव्हती, असती तर ती त्याच्या काळातच प्रसिद्ध झाली असती. पण तसे वास्तव नाही.

ताजमहालच्या आराखड्याबद्दल तसेच नौकानयनासाठी असलेल्या यमुनातीरीच्या (आता गाळाखाली गेलेल्या) धक्क्याचा उल्लेख गोडबोलेंनी केला आहे व कबरीत त्याचे काय काम असा प्रश्न विचारला आहे. पण हा धक्का मुलचा मानसिंगच्या काळातीलच असणार ही शक्यता त्यांनी विचारात घेतलेली नाही. ही मंझिल कोणत्याही सरदाराची असावी तशीच होती व त्यात स्वभावत:च असावीत तशीच तळघरे, नौकानयनासाठीचे धक्के वगैरे बांधकामे असने स्वाभाविक आहे व ती नष्ट करण्याचे कारणही नव्हते. उलट मुळचे तळघ्रर कबरीसाठी वापरणे सोयीस्कर होते. बाजुच्या खोल्या बंद करुन मधल्या भागात सुधारणा करुन कबर बनवली गेली. असावी हे स्पष्ट आहे. बंद खोल्यांबाबतचा विवाद अनाठायी असला तरी त्या जनतेसाठी उघडायला हरकत नाही.

थोडक्यात वरील मुळचे मुख्य हवेलीचे बांधकाम पाडून ताजची निर्मिती नव्याने केली गेली असली तरी मानसिंगाच्या हवेलीचे अवशेष काही प्रमाणात शिल्लक राहिलेले आहेत. त्यावरून संपुर्ण वास्तुचे श्रेय शाहजहानकडून काढून घेत अकारण काल्पनिक पात्रांना देण्याचे काही कारण नाही. ताजची वास्तुरचना स्वतंत्र असून मुळच्या हवेलीतील काही भाग कल्पकतेने त्यात मर्ज केला गेला असे म्हणने अधिक संयुक्तिक आहे.

औरंगजेबाच्या घुमटाच्या दुरुस्तीबाबतच्या १६५२च्या पत्राचा फार गवगवा केला जातो. औरंगजेबाचे पत्र सत्य मानून गळत्यांचा प्रश्न सोडवता येतो. एवढा मोठा घुमट डोम बांधल्यानंतर त्यात मानवी चुकांमुळे टेक्निकल डिफल्ट्स राहु शकतात. गळती होऊ शकते. पण गळती झाली, दुरुस्ती करावी लागली म्हणजे म्हणजे ते बांधकाम पुरातन हा तर्क चुकीचा ठरतो. मानसिंगाची ४२ एकर जागा जयसिंगाने त्यावरील हवेलीसह विकली ही वस्तुस्थिती आहे. त्यावर कोणतेही अलौकीक असे बांधकाम नव्हते. जमीनीवरील मुख्य हवेली पाडून ही इमारत बांधली गेल्याचे स्पष्ट दिसते. मुंडी ते टॅव्हर्नियर यांच्या वर्णनांत कामगारांच्या संख्येबाबत गफलत असली तरी बांधकामाची सुरुवात नव्याने झाल्याची माहिती मिळते. खुद्द पातशहानामा व शाहजहाननामा मानसिंगाकडून जागा घेऊन त्यावर ताजची इमारत उभी करण्याची सुरुवात झाल्याचे नमूद करतात. उलट पु. ना. ओक पातशहानाम्यातील या संदर्भातील वर्णनात गफलत करतात हे आपण वर पाहिले आहे. ताजमहाल पुर्ण होत आल्याचा काळ आणि राजकीय वादळी घडामोडी, शाहजहानचे आजारपण ते कैदेचा काळ दुर्दैवाने परस्परांशी भिडल्यामुळे त्याबाबतची माहिती धुसर होत गेलेली आहे.

Tajmahal
ओवैसीचं औरंगजेब कबर दर्शन; शिवसेनेने दिला 'हा' इशारा

ताजमधील सोने व अन्य संपत्तीचे काय झाले हा प्रश्न गोडबोलेंना प्रश्न पडला असला तरी सुरजमल जाटाने केलेल्या आग्रा स्वारीत ताजमहालाची लुट केली होती हा इतिहास ते विसरतात. तत्पुर्वीही लुट झाली असण्याची शक्यता कशी नाकारता येईल? तसेही ताजवर विद्रुपीकरनाचे संकट १८५७ च्या बंडाच्या वेळीसही आले होते.

मुमताजच्या कबरीभोवती सोन्याचे रेलिंग होते असा उल्लेख पीटर मुंडी करतो, पण हे रेलिंग ताजच्या आवारातील तात्पुरत्या दफनस्थळाभोवती होते. नंतर पुन्हा मुमताजजचे शव हलवून आत्ताच्या स्थानी दफन केल्यानंतर ते रेलिंग ठेवण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे ते कोठे गेले हा प्रश्नही निरर्थक आहे.

वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद असाच भोंगळ आहे. किंबहुना वास्तुरचनांत व त्यावरील कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरील जगदिश्वराचे मंदिर मुस्लिम शैलीत आहे म्हणून ते कोणी मुस्लिमाने बांधले असा कोणी तर्क केला तर तो जेवढा वेडगळपनाचा होईल तेवढाच हिंदु खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचे वास्तुशिल्प होते असा दावा करने मुर्खपनाचे होऊन जाईल. मानसिंगाच्या जुन्या वास्तुतील काही भाग पाडायची गरज नसल्याने तो तसाच राहिला. केवळ तळघर, बंद खोल्या यावरून फार मोठा दावा करण्यापेक्षा त्यंची स्पष्टीकरणे अन्यत्र शोधायला हवीत एवढेच. ताज हिंदुंचा कि मुस्लिमांचा हा वाद निरर्थक असून तो भारतीयांचा आहे हेच लक्षात घ्यायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com