नक्षलवादी ते रिक्षा ड्रायव्हर; संघर्षमय आयुष्याने थक्क करणाऱ्याला दिलंय TMC ने तिकीट

manoranjan vyapari
manoranjan vyapari

कोलकाता : West Bengal Assembly Election 2021 पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी टीएमसी पक्षाकडून अशा एका व्यक्तीला तिकीट दिलंय, ज्या व्यक्तीचं आयुष्य बरंच संघर्षमय राहिलेलं आहे. ही व्यक्ती कधीकाळी नक्षलवादी चळवळीचा भाग राहिलेली होती. त्यानंतर या व्यक्तीने रिक्षा चालवून देखील आयुष्यात गुजराण केली आहे. मनोरंजन व्यापारी असं या व्यक्तीचं नाव असून टीएमसीने बालागढ विधानसभा जागेवरुन त्यांना उमेदवारी दिली आहे. 1920 च्या दशकानंतर नक्षलवादी चळवळीतू बाहेर पडल्यानंतर मनोरंजन व्यापारी यांच्याकडे रिक्षा चालवून पोट भरण्याशिवाय पर्याय नव्हता. पश्चिम बंगालमधील दलित साहित्य अकादमीचे चेअरपर्सन आणि प्रसिद्ध दलित लेखक मनोरंजन व्यापारी यांना टीएमसीने हुगली जिल्ह्यातील बालागढमधून तिकीट दिलं आहे. 

मनोरंजन व्यापारी गेल्या दशकामध्ये दलित साहित्यामध्ये एक मजबूत आवाज म्हणून उभे राहिले आहेत. व्यापारी हे राजकारणापासून फार अनभिज्ञ नाहीयेत. जेंव्हा ते 1953 साली एक राजकीय शरणार्थी म्हणून पश्चिम बंगालमध्ये आले तेंव्हा त्यांना अनेक शरणार्थी शिबिरांमध्ये रहावं लागलं. त्यांना हॉटेलमध्ये आचारी तसेच एका स्मशानभूमीत देखभाल करणाऱ्या व्यक्तीचं काम देखील करावं लागलं आहे. कधी हॉटेलमध्ये काम तर कधी रिक्षा चालवून गुजराण, असं अत्यंत खडतर आणि संघर्षमय असं आयुष्य त्यांचं राहिलेलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, जेंव्हा 60 च्या दशकापर्यंत पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी आंदोलन जोरात सुरु होतं, तेंव्हा ते देखील नक्षलवादाकडे आकर्षित झाले. मात्र, त्यातील नेत्यांची कार्यपद्धती पाहून ते नाराज झाले. त्यानंतर ते राजकीय भुमिकांपासून लांब राहिले आणि जातीव्यवस्थेवर भाष्य करत आपलं लेखन करु लागले आणि पोट भरण्यासाठी रिक्षा चालवू लागले. त्यांची अनेक पुस्तके आणि कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. आणि आता इतक्या नागमोडी वळणांनंतर पुन्हा एकदा ते राजकीय आखाड्यात उतरु पाहत आहेत.

याबद्दल बोलताना ते म्हणाले की, आज बंगालमध्ये फुटीरतावादी राजकारण पहायला मिळतंय, ज्याला भाजप पक्ष पाठिंबा देतोय. तुम्ही विषारी वातावरण अनुभवू शकताय. बंगालमध्ये जे आता घडतंय, ते अभूतपूर्व आहे. याआधी असं झालेलं नाहीये आणि हे थांबवायला हवं. हे हिंसेचं राजकारण आहे. सीएए आणि एआरसीबाबत बोलताना ते म्हणाले की, जर आपण याला विरोध केला नाही तर ते आपल्याला आउटसाईडर ठरवून डिटेन्शन कँपमध्ये ठेवतील. ते पुढे म्हणतात की, म्हणूनच जेंव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माझ्यासमोर उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला तेंव्हा मी तो स्विकारला. मी गेल्या एक दशकापासून मातुओ या अनुसूचित जाती समुदायासाठी त्यांनी केलेलं काम पाहिलं आहे. जेंव्हा त्यांनी मला म्हटलं की आपल्याला जबाबदारी घ्यायला हवी तेंव्हा नकार द्यायला माझ्याकडे काही कारण नव्हतं. 

ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या सर्व 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 'बंगाल को चाहिए अपनी बेटी' या घोषवाक्याखाली निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी 50 महिलांना उमेदवारी देऊ केली आहे. तर 42 मुस्लिम आणि 79 दलितांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अनुसूचित जातीचे 17 उमेदवार देखील तृणमूलकडून रिंगणात आहेत. 27 मार्चपासून सुरु होणारी निवडणूक आठ टप्प्यात होणार आहे तर 2 मे रोजी निकाल लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com