महात्मा गांधींना १५ ऑगस्टला का जायचे होते पाकमध्ये

MJ-Akbar
MJ-Akbar

नवी दिल्ली - महात्मा गांधी यांना १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात व्यतीत करायचा होता, असा दावा माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात केला आहे. अर्थात, पाकिस्तानच्या निर्मितीला पाठिंबा म्हणून त्यांना असे करायचे नव्हते, असे स्पष्टीकरणही पुस्तकात देण्यात आले आहे.

एम. जे. अकबर यांनी ‘गांधीज्‌ हिंदुइझम : द स्ट्रगल अगेन्स्ट जिनाज्‌ इस्लाम’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘महात्मा गांधीजींना स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानात जायचे होते. त्यांना पाकिस्तानला पाठिंबा म्हणून नव्हे, तर फाळणीला विरोध म्हणून तिकडे जायचे होते,’ असे अकबर यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे. अकबर यांनी त्यांच्या पुस्तकात गांधीजी आणि जिना या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या निर्णयांचा, १९४० ते १९४७ या सात वर्षांच्या काळातील त्यांच्या राजकीय खेळ्या, यांची चर्चा केली आहे.

गांधीजींचा धर्माच्या साह्याने भारतात विविध समाजांमध्ये शांतता निर्माण करता येईल आणि भारतात सर्व धर्म गुण्यागोविंदाने राहतील, यावर विश्‍वास होता. तर, महंमद अली जिना हे श्रद्धेपेक्षा धर्माच्या राजकीय वापरावर अधिक भर देणारे होते. मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी ते इरेला पेटलेले होते. त्यामुळेच नंतर जातीय हिंसाचार उसळल्यावर गांधीजी व्यथित झाले होते. ‘माझा देशाच्या फाळणीवर विश्‍वास नाही. विरोध म्हणून त्यांनी मला मारून टाकले तरी मी हसतमुखाने मृत्यूला सामोरे जाईन. म्हणूनच, पाकिस्तानची निर्मिती झाली तर मला तिकडे जाण्याची, राहण्याची, फिरण्याची आणि ते मला काय करतात, हे पाहण्याची इच्छा आहे,’ असे गांधीजी ३१ मे १९४७ ला खान अब्दुल गफार खान यांना म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com