
Year Ender २०२२ : राजकारण ते मनोरंजन; २०२२ मधील कायम लक्षात राहणाऱ्या १० मोठ्या घटना
Year Ender 2022 : अवघ्या १० दिवसांनी २०२२ वर्ष आपल्या सर्वांना अलविदा करणार आहे. यंदाच्या म्हणजेच २०२२ मध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्या आपल्यापैकी प्रत्येकालाचा कायम लक्षात राहतील.
हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
राजकारणात काँग्रेसला २५ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला, तर यूपी-उत्तराखंड आणि गोव्यात भाजपचे पुनरागमन झाले. दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही केजरीवाल यांचे सरकार स्थापन झाले. अशाच काही १० घटनांबद्दल आम्ही आज भाष्य करणार आहोत.
पीएम मोदींच्या सुरक्षेत गोंधळ : नव्या वर्षाची म्हणजेच २०२२ ची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात वैष्णो माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली, यात १२ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ५ जानेवारी रोजी पंजाबमध्ये पीएम मोदींच्या सुरक्षेत मोठा निष्काळजीपणा समोर आला. पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी पुलावर अडवले. जवळपास अर्धा तास मोदींचा ताफा भर रस्त्यात थांबून होता. मोदींचा ताफा जिथे अडकून पडला होता तेथून पाकिस्तानची सीमा अवघ्या २० किमी अंतरावर होती.
हिजाब वाद : कर्नाटकात हिजाब वाद ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू झाला होता, परंतु जानेवारी २०२२ मध्ये या वादाने जोर धरला. ५ राज्यांतील निवडणुका पाहता या प्रकरणावरून बरेच राजकारण झाले. सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा निर्णयही विभागला गेला, त्यामुळे हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे.
५ राज्यांचा निवडणूक निकाल : यावर्षी यूपी, उत्तराखंड आणि पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनी देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली. भाजपने यूपी आणि उत्तराखंडमध्ये पुनरागमन करून इतिहास रचला. त्याचवेळी पंजाबमध्ये केजरीवालांच्या झाडूने भाजपचा सुपडा साफ करत सत्ता स्थापन केली. या विजयाने केजरीवाल राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याचे सिद्ध झाले आहे. गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपची सत्ता आली.
काँग्रेसला मिळाला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष : काँग्रेसला तब्बल २५ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा पराभव केला. निवडणुकीत खर्गे यांना ७,८९७ मते मिळाली. खर्गे हे पक्षाचे दुसरे दलित अध्यक्ष आहेत.
महाराष्ट्र-बिहारमध्ये सत्ताबदल : यंदा महाराष्ट्र आणि बिहारमध्येही सत्तापरिवर्तन पाहायला मिळाले. महाराष्ट्रात मविआ सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. तर, बिहारमध्ये भाजप सत्तेतून बाहेर फेकला गेला. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात विरोधात बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर बिहारमध्ये नितीशकुमार यांनी आरजेडीसोबत महाआघाडीचे सरकार स्थापन करून भाजपला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला.
नुपूर शर्मा वाद : नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीने देशातच नाही तर संपूर्ण जगात खळबळ उडाली. यानंतर नुपूर शर्मांच्या अटकेसाठी देशभरात हिंसक निदर्शने करण्यात आली. या प्रकरणावर सौदी अरेबिया आणि कतारसह सर्व मुस्लिम देशांनीही नाराजी व्यक्त केली. या सर्व घडामोडींनंतर नुपूर शर्मा यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली.
पीएफआयवर बंदी : नुपूर शर्माच्या वक्तव्यावर देशभरातील मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. यानंतर काही दिवसांनी उदयपूरमध्ये हिंदू शिंपी असलेल्या कन्हैयालालची दोन मुस्लिम तरुणांनी निर्घृणपणे गळा आवळून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या हत्येचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. अशीच एक घटना महाराष्ट्रातील अमरावती येथूनही समोर आली. या घटनांमुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या सर्व घटनांमागे पीएफआय संघटनेला जबाबदार धरण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने धार्मिक उन्माद पसरवल्याच्या आरोपावरून पीएफआय संघटनेवर बंदी घातली.
द काश्मीर फाइल्सवरून वाद : काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचे वर्णन करणारा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले. मात्र, या चित्रपाटावरून यावर्षी बरेच वाद झाले. विरोधकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. यानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढले.
लता मंगेशकर यांचे निधन : गानकोकीळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. १९४२ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी करिअरला सुरुवात केली. लता दीदींनी भारतातील अनेक भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
श्रद्धा हत्याकांड : दिल्लीतील मेहरौली येथील श्रद्धा वालकर हत्याकांडाने अवघ्या देश हादरून गेला. श्रद्धाचा प्रियकर आफताबवर श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याचा आरोप करण्यात आले आहे. या वर्षातील हे सर्वात भयंकर हत्याकांड आहे. आफताब सध्या तिहार तुरुंगात बंद आहे.