
निवडणुकीच्या तारखा पुढं ढकलल्यानं आम आदमी पक्ष अडचणीत आलाय.
नवी दिल्ली : महापालिका निवडणुकीच्या (Delhi Municipal Corporation Elections) तारखा पुढं ढकलल्यानं आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) अडचणीत आलाय. याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केलीय. आता आम आदमी पक्षानं यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतलीय. सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिल्लीत महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आम आदमी पक्षानं न्यायालयाकडं केलीय. आम आदमी पार्टी आणि त्यांचे नेते अंकुश नारंग आणि मनोज कुमार त्यागी यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.
आम आदमी पार्टीचं म्हणणं आहे की, मे 2022 मध्ये पक्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका व्हाव्यात. तसेच दाखल केलेल्या याचिकेत 'आप'नं घटनात्मक मुद्द्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. केंद्र सरकारच्या (Central Government) अनौपचारिक संदेशाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) महापालिकेच्या निवडणुका पुढं ढकलण्यासाठी सांगितलं गेलंय का? याआधी राज्य निवडणूक आयोग निवडणूक घेण्यास तयार होतं, पण अनधिकृत संदेश आल्यावर त्यांच्या निर्णयांवर परिणाम झालाय का?, असा सवाल उपस्थित केलाय.
राज्य निवडणूक आयोग दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत असल्याचंही याचिकेत म्हंटलंय. या निवडणुकीसाठी सर्व प्रकारच्या नोटिसा, अधिसूचना व इतर आदेशही काढण्यात आले असून एप्रिलपर्यंत महापालिका निवडणुका होतील, असं सांगण्यात आलंय. AAP च्या माहितीनुसार, हे पत्र 9 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आलं होतं. या पत्रानुसार सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याबाबत बोललं होतं. परंतु, महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तारखांची घोषणा तूर्तास पुढं ढकलण्यात येत असल्याचं सांगितलं जातंय.