
Pakistan Crisis: 5 हजारांची नोट घेऊन फिरत आहेत उपाशी पाकिस्तानी, आता वापरणार मोदींचा फॉर्म्युला?
Pakistan Crisis: पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. आर्थिक संकट आणि राजकीय मतभेदासोबतच महागाईने देशातील जनता त्रस्त झाली आहे. सरकारने गुडघे टेकले असून कोणताही देश मदतीसाठी पुढे येत नाही.
या संकटामध्ये पाकिस्तानकडे असलेला एकमेव उपाय म्हणजे नोटबंदी. पाकिस्तानी अर्थतज्ज्ञांनी सरकारला सल्ला दिला आहे की, देशात 5,000 रुपयांच्या नोटेवर बंदी घालावी, पण शाहबाज शरीफ सरकार असे कोणतेही पाऊल उचलण्यास तयार नाही.
मोदी सरकारने 2016 मध्ये भारतात नोटाबंदी लागू केली होती. तसेच गेल्या महिन्यात, RBI ने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द केली आहे, ही देशातील सर्वात मोठी चलन नोट होती.
नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून येईल:
पाकिस्तानामधील लोक खिशात 5,000 रुपयांच्या नोटा घेऊन फिरत आहेत, तरीही त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. देशातील चलनात असलेले सर्वात मोठे मौल्यवान चलनाची नोट 5,000 रुपये आहे.
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी अर्थतज्ज्ञ नोटाबंदीचा सल्ला देत आहेत. 5 हजार रुपयांच्या मोठ्या नोटा बंद झाल्यास अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा हा मार्ग?
यापूर्वी सोशल मीडियावर एक पॉडकास्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये पाकिस्तानचे सुप्रसिद्ध अर्थतज्ञ अम्मार खान यांनी युक्तिवाद केला की, जवळपास 8 ट्रिलियन रुपये जे चलनात आहेत ते न तपासता चलनात ठेवले तर मोठी समस्या निर्माण होईल.
त्यामुळे सरकारने या नोटा चलनातून रद्द कराव्यात. लोक नोटा बदलण्यासाठी पैसे बाहेर काढतील आणि पैशाच्या रोख प्रवाहात वाढ दिसून येईल. यातून अर्थव्यवस्थेला आधार मिळू शकतो.
श्रीमंत लोक अडचणीत येऊ शकतात:
अम्मार खान यांनी पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, 5 हजाराच्या नोटा बहुतांश श्रीमंत लोकांकडे आहेत. अशा स्थितीत नोटबंदीसारखा निर्णय घेतल्यास सर्वसामान्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
त्यापेक्षा इथल्या श्रीमंत लोकांना याचा त्रास होऊ शकतो, त्याला विरोध होण्याचीही शक्यता आहे. जर सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला तर 8.5 ट्रिलियन इतकी मोठी रक्कम बँकांकडे परत येईल आणि त्यांना आधार मिळेल.
पाकिस्तानी अर्थतज्ज्ञांच्या मते या 5 हजार रुपयांच्या नोटांचा काही उपयोग नाही. देशातील बँकांमध्ये रोखीची समस्या आहे आणि ते कर्ज देऊ शकत नाहीत याचे हे प्रमुख कारण आहे.
अम्मार खान म्हणाले की, 5,000 रुपयांच्या रूपात चलनात असलेले 8 ट्रिलियन रुपये जर देशातील बँकांमध्ये परत आले तर अतिरिक्त पैसा उपलब्ध होईल. जो आर्थिक संकटातून सावरण्यासाठी उपयुक्त ठरेल.
महागाईचा दर 38 टक्क्यांवर पोहोचला:
मे महिन्यात पाकिस्तानातील महागाईचा दर 38 टक्क्यांवर पोहोचला असून सलग दुसऱ्या महिन्यात आशियातील सर्वाधिक महागाई पाकिस्तानमध्ये नोंदवण्यात आली आहे.
परकीय चलनाचा साठा जवळपास संपुष्टात आल्याने दैनंदिन वस्तूंबरोबरच खाद्यपदार्थही लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.