जळगाव : शिक्षण घेत असताना, पुस्तकी ज्ञान मिळते. मात्र, पदवी घेतल्यानंतर त्यांना अनुभवाचीही गरज असते. आता व्यापार, उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थांना मिळणार आहे. शिवाय त्यांना महिन्याला मानधन आणि त्यानंतर विद्यापीठाचे प्रमाणपत्रही मिळणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय व्यापारी महासंघ (कॅट) यांच्यात शुक्रवारी (ता. १७) सामंजस्य करारावर दोन्ही बाजूंनी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून विद्यार्थीभिमुख करार करणारे ‘उमवि’ पहिले विद्यापीठ ठरले आहे.
विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात या करारानिमित्त कार्यक्रम झाला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए बी. सी. भारतीया, उद्योजक पुखराज पगारिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
बी. सी. भारतीया यांनी हा सामंजस्य करार देशात पहिल्यादांच होत असून, वाढत्या बेरोजगारीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना व्यापाराची अनुभूती प्रत्यक्ष घेता येईल. तरुणांनी व्यापार आणि उद्योगाकडे अधिक संख्येने वळण्याची गरज आहे. शिक्षण घेतले नाही तर नोकरी मिळणार नाही, अशाप्रकारचे पालकांकडून वारंवार सांगितले जाते. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिलांनी व्यापाराच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठातील संशोधनातून काही व्यवासायिक ॲक्टीव्हिटी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. श्री. पगारिया म्हणाले, की व्यापारी रोजगार निर्माण करतात. या पुढील काळात व्यापाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज आहे. योग्य माणसे कामासाठी मिळत नाही, ही व्यापाऱ्यांची समस्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कॅटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन निवांगुणे म्हणाले, की या करारामुळे विद्यार्थी आणि व्यापारी या दोघांनाही भरपूर काही शिकायला मिळेल. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळेल, तर व्यापाऱ्यांना मुलांकडून नवे तंत्रज्ञान शिकायला मिळेल. यातून नवा महाराष्ट्र घडणार आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले, की उद्योजक, व्यापारी आणि विद्यापीठ यांच्यातील अपेक्षांची दरी कमी करण्याचा प्रयत्न या करारामुळे होणार आहे. अशाप्रकारचा देशातील हा पहिला करार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात व्यावसायिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना वर्ग खोली बाहेर मिळावे, असे अभिप्रेत आहे. ते आता विद्यार्थ्यांना मिळेल.
व्यापारी महासंघासोबत विद्यापीठ ज्ञानाचे भागीदार म्हणून काम करू इच्छित आहे, असे ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथील व्यापारी महासंघाचे पदाधिकारी अजय शहा यांनी विद्यार्थ्यांना या करारामुळे प्रशिक्षण मिळेल, असे मत व्यक्त केले. नवउपक्रम, नवसंशोधन सहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर यांनी प्रास्ताविक केले.
महासंघातर्फे बी. सी. भारतीया आणि विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, व्यापारी महासंघाचे पुरूषोत्तम टावरी, प्रवीण पगारिया, दिलीप गांधी, नितीन बंग, संजय शहा, विनय श्रॉफ, राजेश गिंदोडीया, संगीता पाटील यांची उपस्थिती होती. प्रा. रमेश सरदार यांनी आभार मानले.
या करारामुळे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना, इंटर्नशिप करता येईल. व्यावसायिक, खासगी व्यापारी प्रतिष्ठानात खानदेशातील दहा ते पंधरा हजाार विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्राप्त होईल. कॅटकडून इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.