रावेर/ वरणगाव : हतनूर मध्यम प्रकल्पाला अगदी लागून असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर, कठोरा, टहाकळी निंभोरा (सावतर) आदी गावांना जुनाट वीज तारांमुळे पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत नाही आणि शेजारी हतनूर मध्यम प्रकल्प असूनही त्याचे पाणी वापरता येत नसल्याने गेल्या १० ते १२ वर्षांपासून केळीचे नुकसान होत आहे; म्हणून संतप्त झालेल्या शंभर-सव्वाशे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १७) वरणगाव येथील वीज उपकेंद्राला धडक दिली. या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जळगाव गाठून पालकमंत्री आणि आमदारांनाही निवेदन दिले.
हतनूर मध्यम प्रकल्प परिसरातील ६ ते ७ गावांत अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होतो. या वीज प्रश्नामुळे मागील १० ते १२ वर्षांपासून या पट्ट्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जून, जुलै महिन्यात करावयाची मृगबहार केळीची लागवड केलेली नाही. या आठवड्यात पुन्हा असा प्रश्न निर्माण झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली या सर्व गावातील शंभर-सव्वाशे शेतकऱ्यांनी वरणगावच्या वीज उपकेंद्राला धडक दिली आणि अधिकाऱ्यांसमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. समोर हतनूर प्रकल्पाचे अथांग पाणी आहे पण ते आपल्या केळीला देता येत नाही, गेल्या आठवड्यात तर १०० तासांपैकी केवळ २० तास वीजपुरवठा मिळाल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आमदार आणि खासदारांना सांगून देखील या प्रश्नावर अजून मार्ग निघत नसल्याने शेतकरी नाराज होते.
तीन वर्षांपासून हतनूर ग्रामपंचायतीने या वीज उपकेंद्रासाठी जागा दिली आहे, वीज उपकेंद्र मंजूरही आहे, परंतु निधीअभावी ते होत नसल्यामुळे शेतकरी संतप्त होते.
आमदार संजय सावकारे यांच्या कानावर हा विषय गेल्यावर त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना जळगाव येथे बोलावून घेतले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्यावेळी जिल्ह्यात सर्वप्रथम प्राधान्याने हतनूर येथील वीज उपकेंद्राची उभारणी करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.