मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव ते धुळे महामार्गावर खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असल्याची वस्तुस्थिती ‘सकाळ’ने मांडली होती. त्यानंतर संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात होती. सुरवातीला डांबर टाकून खड्डे बुजविण्यात येत होते. मात्र आता प्रत्यक्षात मातीमिश्रीत मुरुमाचा खड्डे बुजविण्यासाठी वापर केला जात असून, निव्वळ धूळफेक केली जात आहे. यामुळे प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)
चाळीसगाव - धुळे महामार्गावर ‘सकाळ’च्या बातमीनंतर खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरवातही झाली. मात्र, खड्डे बुजविताना मातीमिश्रीत मुरुम टाकला जात आहे. हा मुरुम व माती गाडीच्या वेगात उडून जात आहे. यातच महामार्गावरून दुचाकीने किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या त्वचेवरही अवघ्या काही मिनिटांमध्ये धुळीचा पातळ थर चढू लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसनाचे आजार आणि श्वास घेण्यासाठी होणारा त्रास यामुळे मेहुणबारेकर बेजार झाले आहेत.
धुळीच्या त्रासाने दुचाकीवरून नागरिकांचा जीव गुदमरू लागला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी याच रस्त्याने लहान मुलांना सकाळी शहराच्या ठिकाणी शाळेत जावे लागते. या मुलांच्या आरोग्यावर देखील याचे दुष्परिणाम होत आहेत. दोन दिवसांपासून हे खड्डे बुजविण्यास सुरवात झाली असली तरी मातीमिश्रीत मुरुम टाकून हे खड्डे बुजविले जात असून, हे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. या धुळीमुळे घशात खवखव, सर्दी आदी समस्या उद्भवत आहेत.
खड्ड्यांबाबत ‘सकाळ’चा पाठपुरावा सुरूच असून, सोशल मीडियावरूनही अनेकांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले आहेत तर काहींनी धुळीच्या त्रासाची समस्या मांडली. एकीकडे खड्ड्यांमध्ये माती टाकून खड्डे बुजविल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच, या धुळीमुळे वाहतुकीची कोंडी होत असते. चाळीसगाव ते मेहुणबारे हे अकरा किलोमीटरचे अंतर पास करण्यासाठी काही वेळा एक तास देखील लागत असतो. यामुळे सर्व वाहनचालकांसह दुचाकीस्वार वैतागले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पावसामुळे खड्डे पुन्हा ‘जैसे थे’
मेहुणबारे परिसरात शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी पाऊस झाल्याने काही ठिकाणी मुरुमाने बुजविलेले खड्डे ‘जैसे थे’ झाले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना बहुतांश वेळा रात्री जीव मुठीत धरून जावे लागते. चालकांना वाहन चालविणे अवघड होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.