Jalgaon News : केंद्र सरकारच्या टपाल सेवेत कार्यरत साकळी येथील रहिवासी असलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाने गुरुवारी (ता.१४) गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. साकळी (ता. यावल) येथील हनुमानपेठ भागातील रहिवासी असलेला निखिल रवींद्र परिस्कर (कुंभार) (वय ३२) हा काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या टपाल विभागात नोकरीला होता. (Jalgaon Extreme step taken by postal worker)
गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी निखिलला नोकरीच्या ठिकाणी वरच्या पदावर बढती मिळाली होती. किनगाव ते चोपडा तालुक्यातील आठ ते दहा खेड्यांमधील टपाल कार्यालयात व्हिजिट अधिकारी म्हणून त्याला तपासणीला जावे लागत असे. निखिल हा अतिशय मनमिळावू, विनम्र, भावनिक तसेच मित्र परिवाराचा चाहता होता.
तो आई, वडील, पत्नी व बारा वर्षांच्या मुलासह सुखी कुटुंबासह वास्तव्य करीत होता. दरम्यान, काही दिवसांपासून निखिल मानसिक तणावात होता. निखिल गुरुवारी (ता. १४) सकाळी नेहमीप्रमाणे चोपडा तालुक्यातील काही टपाल कार्यालयांना भेटी देण्याच्या कामानिमित्ताने चोपड्याकडे गेला होता. परंतु सायंकाळी अंदाजे साडेपाच ते सहाच्या दरम्यान निखिलने चोपडा-हातेड रस्त्यावरील काजीजूर गावाजवळी पुलाखाली दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले.
या घटनेच्या अगोदर नैराशाच्या भावनेने निखिलने आपल्या काही मित्रांना फोनवर लोकेशन टाकून व फोन करून 'मी आत्महत्या करीत आहे, आता मी तुम्हाला पुन्हा भेटणार नाही असे सांगितले. मित्रांनी तत्काळ त्याची शोधाशोध करायला सुरवात केली. मात्र निखिलचा फोन स्वीच ऑफ झाल्याने ते सर्व जण अपयशी ठरले. अखेर क्रूर नियतीने निखिलचा घात केला. त्याने त्याची मोटारसायकल घटनास्थळी पुलाच्या वर लावलेली होती.
दरम्यान, शुक्रवारी (ता. १५) त्याच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात साकळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेच्या वेळी कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने साकळीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावरुन मृतदेह आणण्यासाठी स्थानिक नागरिकांसह चोपड्याचे डॉ. चंद्रकांत बारेला, साकळीचे अमोल मोते.
गिरीश प्रजापती, योगेश कुंभार यांच्यासह मित्रपरिवाराने व पोलिस प्रशासनाने धावपळ केली तर दवाखान्याच्या कामासाठी साकळीचे सरपंच दीपक पाटील, भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ. सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र मराठे, उमेश बडगुजर यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. निराशेच्या भावनेतून घटनेच्या काही दिवस अगोदर निखिलने घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मोबाईलवर मेसेज स्टेटस ठेवलेले होते. त्यामुळे सर्वांना एकच खंत वाटत आहे.
मानसिक त्रासातून टोकाचे पाऊल
घटनेचे कारण अस्पष्ट आहे. मात्र निखिलला त्याचा नोकरी ठिकाणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मानसिक त्रास होता, अशी गावात सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे त्रास देणारा तो अधिकारी कोण? त्याला कोणते मानसिक टेन्शन होते? याबाबत चौकशीतून बाहेर येईल. दरम्यान त्या अधिकाऱ्याविरुद्ध मृत निखिलचे कुटुंबीय पोलिसात लेखी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत निखिलच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक चार वर्षांचा मुलगा, दोन लहान भाऊ असा परिवार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.