वाकडी : येथील धरणात एप्रिलच्या शेवटी ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात वीजपंप मोठ्या प्रमाणात टाकल्याने पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. तपमानातील वाढ व उपश्यामुळे दिवसेंदिवस साठा कमी होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वाकडी धरणातून कासली, तळेगाव, राहेरा, कर्णफटा असा अनेक गावांच्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन नेली आहे. (Jalgaon Huge amount of water is pumped from wakadi dam reservoir 30 percent reserve)
वाकडी येथे उन्हाळ्यात पाण्याची समस्या नियमित निर्माण होते. याच धरणातून कर्णफटा, वाकडी या गावांना पाणीपुरवठा केला जातो. धरणाच्या आजूबाजूला व परिसरात बागायती शेती मोठ्या प्रमाणात असून, दुबार पिके शेतकरी घेत आहेत. त्यामुळे लघुसिंचन पाटबंधारे विभाग पाणी उपश्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी देतो का, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
मात्र, किती शेतकरी परवानगी घेतात, हाही प्रश्न आहे. धरणात मोटारींचे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण झाले आहे. ५० वरून अधिक वीजपंप धरणात आहेत. वीज कंपनीची परवानगी न घेता कनेक्शन देण्यात आली आहेत. (latest marathi news)
वाकडी परिसरात मका, ज्वारी, बाजरी, केळी ही पिके घेतली जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यक भासते. या वर्षी धरण ८० टक्के भरले. मका, ज्वारी, सूर्यफूल, गहू कांदा, हरभरा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे.
पाणी उपसा कायम राहिल्यास पाणीटंचाईच्या समस्यांना वाकडीसह परिसरातील गावांना तोंड द्यावे लागणार आहे. होणाऱ्या पाणी उपश्यास निर्बंध घालणे आवश्यक आहे. वाकडी परिसरात वन्यजीव, जनावरे आहेत. त्यांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या येऊ शकते.