बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर मार्ग; महामार्ग हस्तांतरणाची प्रक्रिया गतिमान 

ankleswar burhanpur highway
ankleswar burhanpur highway

रावेर (जळगाव) : महाराष्ट्रातील जळगाव- धुळे - नंदुरबार या आणि मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर - अंकलेश्वर रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित होण्यासाठी या रस्त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया गतिमान झाली असून, या रस्त्याबाबत अंतिम चर्चा करण्यासाठी रस्ते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची उद्या मंत्रालयाच्या सचिवांसोबत चर्चा होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या चर्चेनंतर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यास गती येण्याची अपेक्षा आहे. 

मागील आठवड्यात अंकलेश्वर- बऱ्हाणपूर या ३ राज्यांना जोडणाऱ्या राज्यमार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्याचा आदेश राजपत्रात जाहीर झाला होता. या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कार्यालयांकडून हस्तांतरणाचे पत्र मागविण्यात आले आहे. आगामी महिनाभरात या संपूर्ण रस्त्याचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होईल आणि त्यानंतर या रस्त्याच्या विविध कामांचे प्रस्ताव तयार करणे, त्याच्या निविदा प्रसिद्ध करणे, त्या मंजूर करून त्यासाठी निधीची तरतूद करणे या प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली. या विभागाच्या राष्ट्रीय सचिवांची रविवारी (ता. ४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक होणार असून, या बैठकीत या राष्ट्रीय महामार्गाबाबत गडकरींकडून अंतिम निर्देश मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

दीड वर्षाचा कालावधीची शक्‍यता
रस्ता हस्तांतरण ते थेट निधी मिळेपर्यंत या प्रक्रियेला सुमारे दीड वर्ष लागू शकेल आणि त्यानंतर रस्त्याच्या चौपदरीकरणाची सुरवात होईल, अशीही माहिती या विभागाकडून देण्यात आली. चौपदरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जागा संपादन करणे आवश्यक राहील आणि त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता राहील तसेच त्यासाठी वर्ष दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता आहे. दरम्यान, हा सर्व राष्ट्रीय महामार्ग डांबरीकरणातून व्हावा का सिमेंट कॉंक्रिटच्या माध्यमातून व्हावा, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. 

निधीसाठी हवा पाठपुरावा 
या राष्ट्रीय महामार्गासाठी काही हजार कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. सध्या दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार असून, या रस्त्यालगतच्या सर्वच लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्यात रावेर - रक्षा खडसे, जळगाव - उन्मेष पाटील, धुळे- डॉ. सुभाष भामरे, नंदुरबार - डॉ. हिना गावित, अंकलेश्वर - डॉ. सी. आर. पाटील आणि बऱ्हाणपूर - (कै.) नंदकुमारसिंह चौहान यांचा समावेश आहे. या सर्वच लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या निधीसाठी एकत्रित पाठपुरावा करण्याची गरज या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com