जामनेर : गेल्या सात-आठ सप्टेंबरला तालुक्यातील ओझर-हिंगणे परिसरात आलेल्या वादळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील शेतीक्षेत्राचे (Crop Damage ) नुकसान झाले. मात्र, महिना उलटला तरी शासनातर्फे नुकसानग्रस्त पीडित शेतकऱ्यांना (Farmers) अद्यापही आर्थिक मदत मिळालेली नाही. परिणामी, पीडित शेतकरीवर्ग तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे उंबरठे झिजवून मेटाकुटीस आला आहे. शासनाकडे नुकसानीचा प्रस्ताव पाठविला आहे, असे नेहमीच्या शैलीत संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगून वेळ मारून नेली जाते. शिवाय, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडेही शेतकरीवर्ग आपली कैफियत मांडतच आलेला आहे. तेथेही फक्त आश्वासनाशिवाय अद्यापही हाती काही लागले नाही.
.
या पिकांचे नुकसान
तालुक्यात महिनाभरापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली होती, तर काही भागात चक्रीवादळाचाही फटका पिकांना बसून मुख्यतः केळी, मका, कपाशीची उभी पिके पार जमीनदोस्त झाली, काही दिवसांत हाती येणारे यंदाचे उत्पन्न कायमचे हातून गेल्याने शेतकरी पूर्णतः हतबल होऊन बसला. शिवाय, ओझर आणि परिसरातील घरांचेही मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. मागोमाग पशुधनालाही चांगलाच फटका बसून शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडल्याचेच त्यावेळची परिस्थितीलो पाहता दिसून आले.
लोकप्रतिनिधींचे दौरे निष्फळ
तालुक्यातील नुकसानीची माहिती मिळताच माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, आमदार किशोर पाटील आणि इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत लव्याजाम्यासह या भागातील पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्तांना शासनातर्फे तातडीने आर्थिक मदत देण्यात येईल, असे घोषित केले होते, हे येथे उल्लेखनीय म्हणावे लागेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.