Jalgaon Election 2023 : महापालिकेत निवडणुकीपूर्वीच राजकीय घमासान; सत्ताधारी संतप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Election 2023

Jalgaon Election 2023 : महापालिकेत निवडणुकीपूर्वीच राजकीय घमासान; सत्ताधारी संतप्त

Jalgaon News : महापालिकेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र, त्या अगोदरच राजकीय घमासान सुरू झाले आहे.

भाजपचे (BJP) खासदार व आमदारांनी सत्ताधाऱ्यांना कोणतीही माहिती न देता परस्पर अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याने ते संतप्त झाले आहेत. (Municipal elections are just 4 months away but the political turmoil has already started jalgaon news)

निवडणुकीपूर्वी भाजप राजकीय खेळी करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता होती.

तब्बल ५७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, अडीच वर्षांनंतर तब्बल २९ नगरसेवक फुटले आणि भाजपची सत्ता खालसा झाली आणि शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री महाजन महापौर झाल्या.

त्यामुळे भाजपला विरोधी गटात बसावे लागले. महापालिकेत अडीच वर्षांचा सत्तेचा काळ शिवसेनेला मिळाला आहे. आता अडीच वर्षांचा कालावधी संपण्यासाठी काही महिनेच राहिले आहेत. त्यानंतर महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता महापालिकेत राजकीय खेळी सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

खासदार, आमदारांचा आढावा

भाजपचे खासदार उन्मेश पाटील व आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी (ता.२०) महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या महापौर व उपमहापौरांना पाचारण केले नाही. त्यांनी ही बैठक परस्परच घेतल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सत्ताधाऱ्यांची नाराजी

भाजप खासदार उन्मेश पाटील व आमदार सुरेश भोळे यांनी परस्पर घेतलेल्या बैठकीमुळे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना (ठाकरे) गटाचे महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन व नगरसेवकांनी नाराजी दर्शविली आहे.

अपयश लपविण्याचा प्रयत्न : जयश्री महाजन

महापौर जयश्री महाजन यांनी भाजपच्या खासदार व आमदारांनी परस्पर घेतलेल्या बैठकीवर नाराजी दर्शविली आहे. याबाबत त्या म्हणाल्या, की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी बैठक घेण्यास हरकत नाही, त्यांचाही अधिकार आहे. मात्र, आम्हाला माहिती दिली असती, तर आम्हीही उपस्थित राहिलो असतो.

यापूर्वी अशी आढावा बैठक कधीच घेतली नाही. अडीच वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती. त्यावेळी त्यांना शहरातील जनता आठवली नाही. त्यामुळे शहरात ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, हे त्यांचे अपयश आहे. आपले अपयश कसे लपविता येईल, यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे.

...तर महापालिकेतही फुटीराकडून ‘भाजप’वर दावा

राज्यात शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगानेही त्यांची मागणी मान्य करीत निर्णय दिला आहे. याच धर्तीवर भाजपतून फुटलेले नगरसेवकही आता भाजपवर दावा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

महापौर निवडीवेळी भाजपच्या ५७ नगरसेवकांपैकी तब्बल २९ नगरसेवक पक्षातून बाहेर पडले होते. त्यामुळे भाजपकडे २७ नगरसेवक होते.

फुटलेल्या नगरसेवकांनी बहुमताच्या आधारावर आम्हीच ‘भाजप’ आहोत, असा दावा करीत आमचा व्हीप मोडला, म्हणून भाजपच्या २७ नगरसेवकांवर निलंबीतची कारवाई करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. अद्याप त्यावर विभागीय आयुक्ताकडे सुनावणी प्रलंबीत आहे.

त्या सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी याचिका महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.

त्यामुळे या सुनावणीला स्थगिती मिळाली आहे. आता महापौर जयश्री महाजन यांनी ही याचिका मागे घेण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडे निकाल लागू शकतो.

फुटलेल्या गटाकडे बहुमत असल्यामुळे मूळ भाजपबाबत प्रश्‍नचिन्ह जळगाव महापालिकेत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावरही महापालिकेत चर्चा सुरू आहे. आगामी काळात याबाबतही राजकीय उलटफेर होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे.

याबाबत भाजप फुटीर गटाचे नेते ॲड. दिलीप पोकळे यांनी सांगितले, की आपण भाजप गटनेतेपदाचा दावा केला आहे, तो आजही कायम आहे.

याबाबत आपल्या बाजूने निर्णय झाल्यास आपण भाजप गटनेता म्हणून राहणार आहोत, तसेच भाजपची शिवसेना शिंदे गटासोबत युती असल्यामुळे त्या निर्णयानुसार आमची युती राहील.