सुधाकर पाटील : सकाळ वृत्तसेवा
Jalgaon Girna Dam : गिरणा धरण सलग चार वर्षे शंभर टक्के भरल्यानंतर यंदा धरणात ५६.७३ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाची सद्यःस्थिती पाहता, रब्बी हंगामाला पाणी मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तने तर पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी एक आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. (Only 56.73 percent water storage in Girna dam jalgaon news )
गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन केव्हा सुटेल याकडे गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. यंदा मात्र गिरणेत पुरेसा पाणीसाठा नसल्याने रब्बी हंगामासाठी पाणी सुटण्याची शक्यता फार कमी आहे. गिरणा धरण सलग चार वर्षे शंभर टक्के भरल्याने धरणातून रब्बी हंगामासाठी कालव्याव्दारे चार वर्षे पाणी सोडण्यात आले.
त्यामुळे गिरणा पट्ट्यात चार वर्षे रब्बीत सर्वत्र हिरवाईचे वातावरण पहायला मिळत होते. यंदा धरणात आतापर्यंत ५६.७३ टक्के एवढाच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बीसाठी पाणी सुटण्याची फार काही शक्यता नाही.
गिरणा धरणावर एकूण ६९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. पाटचाऱ्यांची दुरवस्था पाहता, साधारणत: २५ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंतच पाणी पोहचते.
पिण्यासाठी चार आवर्तन
यंदा शेतीसाठी पाणी सुटण्याची शक्यता नाही. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तने सुटू शकतात. पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सुटण्याची शक्यता असून त्यानंतर दर दोन महिन्यांनी आवर्तन सुटू शकतात.
गिरणेवर निम्म्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा शहरासह १५६ गावांच्या पाणीपुरवठा योजनांना गिरणा नदीचा आधार आहे. लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात आवर्तनाबाबत निर्णय होणार आहे.
पूर्व हंगामासाठी एक आवर्तन हवे
यंदा खरीप हंगाम चांगला बहरला होता. मात्र, पावसाच्या अवकृपेमुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर कापसावरही ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
त्यामुळे पूर्व हंगाम कापूस लागवडीसाठी गिरणा धरणातून साधारणतः मे महिन्यात किमान एक आवर्तन मिळायला हवे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच पूर्व हंगामी कापूस लागवडीसाठी गिरणा पाटबंधारे विभागाने एक आवर्तनाचे नियोजन करावे अशी अपेक्षा आहे.
गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यक्षेत्र
कालवा...........लांबी.........वितीरीका..........क्षेत्र
(कि. मी.मधे) (की.मी.) (हेक्टरमधे)
जामदा डावा....56.36........418..............18658
जामदा उजवा...32.18.......250...............3663
निम्न गिरणा.....45.5......... 492...............34888
पांझण डावा.....53.20........317..............12141
गिरणा धरणाची सद्य:परीस्थीती
#गिरणा धरणाची क्षमता...21500 दशलक्ष घनफूट
#उपयुक्त जलसाठा.....18500 दशलक्ष घनफूट
#मृत पाणीसाठा ....3000 दशलक्ष घनफूट
#सद्यस्थितीला पाणीसाठा..13494 दशलक्ष घनफूट
#लाभक्षेत्र.....69 हजार हेक्टर
गिरणा धरणावर अंवलबून असलेले क्षेत्र (हेक्टरमधे)
तालुका.............अवलंबून क्षेत्र
चाळीसगाव..........963
भडगाव.............10563
एरंडोल...............10354
धरणगाव.............22187
अमळनेर..............10258
पारोळा................2884
मालेगाव..............1000
धुळे.....................1700
''गिरणा धरणात कमी पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असेल. आवर्तनाबाबत कालवा सल्लागार समितीत निर्णय घेतला जाईल.''- देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.