Jalgaon Crime News : विखरण (ता.एरंडोल) येथे कांद्याच्या गोण्यांवरून दोन गटात झालेले वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह पोलिसपाटील जखमी झाले.
या वेळी एका गटाच्या युवकांनी पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (policeman along with an assistant inspector were injured in mob attack jalgaon crime news)
तसेच महिलांना देखील मारहाण करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दहा संशयितांना अटक केली असून, २२ जण पसार झाले आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून, शीघ्र कृती दलासह पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सागर ऊर्फ पवन चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की ते समाधान माळी यांच्यासोबत चोरटक्की शिवारातील सलीम शेख यांच्यासह रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कांद्याच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकसह विखरण येथे येत असताना रस्त्यावर ट्रकमधून कांद्याच्या सहा ते सात गोण्या खाली पडल्या.
सागर ट्रक थांबवून गोण्या घेण्यासाठी खाली उतरले असता त्यांना चोरटक्की येथील भिल समाजाचे सात ते आठ युवक गोण्या नेत असल्याचे दिसले. सागर यांनी गोण्या नेण्यास विरोध केल्याने त्यास मारहाण केली. सागर हे गावात आल्यावर त्यांनी झालेल्या मारहाणीची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर गावातील चौधरींसह सात जण गोण्या घेण्यासाठी परत गेले असता त्यांना युवकांनी शिवीगाळ करून धमकी दिल्यामुळे ते परत आले.
सोमवारी (ता.१) सकाळी साडेअकराच्या सुमारास ग्रामपंचायतीजवळ चोरटक्की येथील गोविंदा पवार, एकनाथ भिल्ल, गोकूळ भिल, जितेंद्र मालचे, जितेंद्र भिल, रतन भिल, राजू भिल, रवींद्र ठाकरे, अनिल ठाकरे, भूषण पवार, गोलू पवार, कमलेश इंगळे, वसंत मोरे यांच्यासह दहा ते अज्ञात व्यक्ती लाकडी दांडा आणि लोखंडी रॉड घेऊन आले.
पोलिसपाटील विनायक पाटील यांनी त्यांना हटकले असता युवकांनी त्यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली आणि मला मारण्यासाठी जमाव धावून आला. त्याचवेळी गावात पोलिस गाडी आल्यामुळे पोलिसांनी सागर चौधरी यांना पोलिस गाडीत बसविले असता जमावाने पोलिस गाडीवर हल्ला करून गाडीची तोडफोड केली.
तसेच सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांच्यासोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. युवकांच्या मारहाणीत सहाय्यक निरीक्षक जखमी झाले. याबाबत सागर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटक्की येथील नाना बाबूराव बागडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ट्रकमधून सहा ते सात गोण्या पडल्यामुळे माझा मुलगा गणेश आणि वस्तीतील काही युवक गोण्या उचलण्यासाठी गेले.
त्याचवेळी काही अंतरावर ट्रक थांबला आणि त्यामधून सागर चौधरी खाली उतरला आणि कांद्याच्या गोण्या उचलू नका, असे सांगून शिवीगाळ करू लागला. त्यावेळी सागर आणि त्याच्यासोबत ट्रकमध्ये युवकांसोबत भिल समाजातील युवकांचे वाद झाले. त्यानंतर कांद्याचे व्यापारी सलीम खाटीक हे चोरटक्की येथे आले आणि गोण्या परत देण्याचे सांगितल्यावर मी घरातील एक गोणी दिली आणि उद्या सकाळी उर्वरित गोण्या देतो, असे सांगितले.
व्यापारी खाटीक त्या ठिकाणाहून निघून गेले. रात्री साडेसातच्या सुमारास नाना बागडे हे परिवारासह जेवण करीत असताना सागर चौधरी हे तुका महाजन, समाधान माळी, भूषण महाजन, कैलास महाजन, योगेश महाजन, लोटन चौधरी यांच्यासह तीन ते चार अनोळखी व्यक्ती आले आणि सागरला का मारले, असे विचारून मारहाण करू लागले. तसेच जातीयवादी शिवीगाळकरून त्यांनी केलेल्या मारहाणीत डाव्या हाताला व खांद्याला मार लागला आहे.
मारहाण केल्यानंतर सर्व जण मागील गल्लीत राहणारे किसन पवार यांच्या घरी गेले आणि पवार यांच्यासह त्यांची पत्नी संगीता पवार, वैशाली ठाकरे, हिंमत पवार यांना देखील शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण करून शिवीगाळ केली. नाना बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले, आहे की सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास विखरण येथील पोलिसपाटील विनायक पाटील यांनी मोबाईलवर घटनेची माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांसह शासकीय वाहनाने अहिरे हे विखरण येथे गेले. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ भिल्ल समाजाचे युवक लाकडी दांडे आणि लोखंडी पाइप घेऊन उभे होते.
निरीक्षक अहिरे यांनी सर्वांचे व्हीडिओ शूटिंग घेतली आणि उपनिरीक्षक शरद बागल यांना एरंडोल येथून पोलिस बंदोबस्त घेऊन येण्याचे सांगितले. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जमलेल्या भिल्ल समाजातील युवकांना नाना बागडे यांनी दिलेली तक्रार नोंद करण्यात आली असून, संशयित सागर चौधरी यास ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजावून सांगितले. मात्र जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
त्याचवेळी जमावातील एकाने पोलिसपाटील विनायक पाटील यांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरवात केली. निरीक्षक अहिरे यांनी पोलिसपाटील विनायक पाटील यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता जमावातील एकाने निरीक्षक अहिरे यांना देखील मारहाण करून जखमी केले. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिस वाहनात असलेल्या सागर चौधरी यास मारहाण करण्यासाठी पोलिस गाडीवर हल्ला करून गाडीच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केले.
त्यानंतर उपनिरीक्षक शरद बागल हे पोलिस कर्मचाऱ्यांसह विखरण येथे आल्यानंतर जमावाला पांगविण्यात आले. सहाय्यक निरीक्षक अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोविंदा पवार, एकनाथ भिल, गोकूळ भिल, जितेंद्र मालचे, जितेंद्र भिल, रतन भिल, राजू भिल, रवींद्र पवार, शंकर पवार, मधुकर पवार, गणेश सोनवणे, राजेंद्र ठाकरे, अनिल ठाकरे, भूषण पवार, गोलू पवार, कमलेश इंगळे, वसंत मोरे यांच्यासह अन्य दहा ते पंधरा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी दोन्ही गटातील दहा जणांना अटक केली असून २२ जण फरार झाले आहेत.
पोलिस फौजफाटा घटनास्थळी
विखरण येथे दोन गटातील वादात सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, पोलिसपाटील विनायक पाटील यांच्यावर जमावाने हल्ला केल्याचे समजताच पारोळ्याचे निरीक्षक सुनील पवार, धरणगावचे निरीक्षक उद्धव डमाळे, कासोदा पोलिस ठाण्याचे कर्मचारी विखरण येथे दाखल झाले. सद्यःस्थितीत विखरण येथे तणावपूर्ण शांतता असून, पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.