
Jalgaon News : ‘मविआ’कडून उपेक्षा, शिंदे सरकारकडून अपेक्षा : प्रा. जोगेंद्र कवाडे
पाचोरा (जि. जळगाव) : गतकाळात आमचा पीआरपी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत होता. शिवसेनेचा विषयच नव्हता. मोठ्या अपेक्षेने आम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत राहिलो. परंतु त्यांनी आमची उपेक्षा केली. त्यामुळे आम्हाला नवीन राजकीय मैत्री करणे गरजेचे होते. (Prof Jogendra Kawade statement about maha vikas aghadi and shinde government jalgaon news)
दरम्यानच्या काळात राजकीय उलथापालथ होऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांचे नेतृत्व व राज्याचे सरकार लोकाभिमुख असल्याचा विश्वास पटल्याने त्यांच्याशी मैत्री केली आहे.
त्यामुळे आता त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, असे पीआरपी पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. येथील जनता वसाहतीतील बुद्धविहाराचे विस्तारीकरण व सुशोभीकरण कामाचे लोकार्पण तसेच लढवय्या भीमसैनिकांच्या सन्मान सोहळ्यासाठी प्रा. कवाडे रविवारी पाचोरा येथे आले होते.
या कार्यक्रमाच्या अगोदर त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या शिवालय या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपल्या नव्या राजकीय मैत्री संदर्भात स्पष्टीकरण दिले व मविआ सरकारवर बोचरी टीकाही केली.
याप्रसंगी पीआरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, राजू मोरे, जगन सोनवणे, आमदार किशोर पाटील, किशोर बारवकर, मुकुंद बिल्दीकर, प्रवीण ब्राम्हणे, जय वाघ, आनंद नवगीरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
हेही वाचा: Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिवसाला आत्मदहन, अन्नत्याग; पोलिस यंत्रणेचा ताण वाढणार
या प्रसंगी प्रा. कवाडे यांनी स्पष्ट केले, की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व समाजघटकांना न्याय देईल व त्यांना विकासाच्या प्रवाहात आणेल. शिंदे यांनी दाखवलेले राजकीय धाडस हा त्यांचा फार मोठा जिगरबापणा असल्याचे सांगून शिंदे सरकारशी आम्ही राजकीय मैत्री केल्याने दलितांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आमची ही आघाडी राज्यस्तरीय असून, आघाडी करताना कोणत्याही प्रकारच्या देवाणघेवाणीवर चर्चा नाही. परंतु ही नवी मैत्री पीआरपी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सन्मानजनक वागणूक देईल, यावर मात्र विश्वास आहे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीच्या प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे जागांचे योग्य व न्याय्य वाटप करतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडे मांडले प्रश्न
राज्यातील मागासवर्गीय, अल्पसंख्यांकांपुढील जे प्रश्न आहेत, ते सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले असून, ते सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे शिंदे यांनी आश्वस्त केले आहे व एकंदर त्यांची कामकाजाची पद्धत व गती पाहता हे प्रश्न मार्गी लागतील, यावर दृढ विश्वास असल्याचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केले. आमदार किशोर पाटील यांनीही प्रा. कवाडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना दुजोरा देत त्यांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली व आभार व्यक्त केले.
हेही वाचा: Jalgaon Crime News : नगरदेवळा येथील शेतातून 28 क्विंटल कापूस लंपास