चाळीसगाव : तालुक्यात नाम फाउंडेशनसह विविध कंपनींच्या ‘सीआरएस’ फंडमधून मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनासाठी कामे केली जात आहेत. गिरणा धरणाच्या डाव्या कालव्याच्या १२ नंबर पाटचारीचे पुनर्जीवन याच माध्यमातून होत आहे.
या कामामुळे सुमारे अडीच हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. शिवाय परिसरातील गावांची तहान देखील यामुळे भागली जाणार आहे. या कामाचा शुभारंभ शेतकऱ्यांच्याहस्ते नुकताच करण्यात आला.
चाळीसगाव तालुक्यात एपीरॉक अमृतधारा कार्यक्रमांतर्गत विविध गावात तलावांची निर्मिती केली जात आहे. काही दिवसांपूर्वी दस्केबर्डी या गावाची एपीरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड कंपनीचे धनाजी पुरी, नाम फाऊंडेशनचे गणेश थोरात, भूजल अभियानाचे गुणवंत सोनवणे यांच्यासह भूजल वारकरी टीमने शिवार फेरी केली होती. (Two and a half thousand hectares of land will come under irrigation Jalgaon News)
त्यानंतर अवघ्या आठच दिवसात ‘एक गाव एक तलाव’ उपक्रमांतर्गत कळमडू गावाचे सुपुत्र तथा पुणे येथील संगणक अभियंता गुणवंत सोनवणे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामांमध्ये नाम फाऊंडेशन तसेच काही खासगी कंपनींच्या आर्थिक मदतीसह लोकसहभागही दिसून येत आहे.
गिरणा धरणाच्या डाव्या कालव्याच्या १२ नंबर पाटचारीचे पुनर्जीवन झाल्यानंतर विशेषतः शिदवाडी, दस्केबर्डी, खेडी, पोहरे व कळमडू या पाच गावांना फायदा होणार आहे. शिवाय साधारण १ हजार ते १ हजार २०० हेक्टर जमिन ओलिताखाली येईल. तलावातील गाळ उपासल्याने येथील खोली वाढून जलसाठा अधिक वाढणार आहे. शासनाकडून नवीन चारी झाल्यानंतरही यातून पाणीच वाहिले नव्हते.
परिणामी, रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण व्हायची. पहिले पीक पावसाच्या पाण्यावर तर यायचे. नंतर मात्र, रब्बीच्या पिकाला पाणी अपूर्ण पडल्यामुळे शेतकऱ्यांचा बी-बियाणे आणि खतांवर केलेला खर्च वाया जात होता. शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत होते. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी भूजल अभियान चळवळीने गती घेतली आहे. ही चळवळ आता लोकचळवळ झाली गावागावांतील ग्रामस्थांचा या चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अमृतधारा प्रकल्पाच्या अंतर्गत व नाम फाऊंडेशनच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर अर्थसाह्य उभे राहिले आहे. या दोन्ही संस्थांच्या मदतीतून तालुक्यातील सात गावांमध्ये पाझर तलावांचे काम सुरु आहे. यातील मौजे लोंढे, वडाळा- वडाळी व राजमाने येथील तलावांचे काम पूर्ण झाले असून तेथील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यान १२ नंबर पाटचारीच्या कामामुळे शिदवाडी, दस्केबर्डी, पोहरे, खेडी व कळमडू या गावातील सुमारे अडीच हजार हेक्टर शेती क्षेत्र रब्बी पिकाच्या ओलिताखाली येणार आहे. या कामासाठी सिंचन विभागाचे सर्व अधिकारी, अभियंता व पाटकरी यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती अभियंता गुणवंत सोनवणे यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.