राज्य कृषी विभाग 'यामुळे' आला मेटाकुटीला...

agriculture post pending recruitment  in ratnagiri kokan marathi news
agriculture post pending recruitment in ratnagiri kokan marathi news

सावंतवाडी (सिंधुदुर्ग ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी विस्ताराच्या विविध योजना आणल्या जात आहेत. बहुचर्चित चांदा ते बांदा योजनेमध्येही कृषी विकासावर भर होता; मात्र याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेला राज्य कृषी विभाग मात्र रिक्त पदांमुळे मेटाकुटीला आला आहे. या विभागात अद्यापही १०७ पदे रिक्त आहेत.


मुख्यमंत्र्यांनी नुकतीच राज्यात ७० हजार पदे भरण्याची घोषणा केली आहे. यातून रिक्त पदाची समस्या मार्गी लागेल, अशी आशा असली तरी अंमलबजावणी कधी होईल? यावर प्रश्‍नचिन्ह आहे. शासनाकडून रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘अ’ व ‘ब’ गटातील पदांसाठी भरती करण्यात येते; मात्र कृषी क्षेत्रातील रिक्त पदांसाठी कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कुठल्याही प्रकारची जाहिरात निघालेली नाही. अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अवजारांच्या साह्याने श्रम व मनुष्यबळ कमी झाल्याने शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिले आहे व त्यातच बेरोजगारीचा मुद्दा समोर असल्याने युवापिढीही कृषिक्षेत्राला रोजगार म्हणून बघत आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या शेतकरी आणि शासन यामधील महत्त्वाचा दुवा समजला जात आहे;

रिक्त पदांमुळे कृषी क्षेत्राला अडसर

मात्र यासाठी महत्त्वाचा घटक हा शासकीय अधिकारी व कर्मचारी असल्याने कृषी क्षेत्राच्या दृष्टीने शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे प्रमुख कार्य हे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत असते. विशेषतः कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी अशा पदावर कार्यरत असलेले अधिकारी हे यात प्रामुख्याने जबाबदारी पार पडतात. असे असतानाही रिक्त पदांमुळे कृषी क्षेत्राला विकासाचा अडसर म्हणून या रिक्त पदांची बाब पुढे येत आहे.

आर्थिक विकासाची चालना मिळेना

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही तालुक्‍यात दुष्काळसदृश्‍य भाग आहे. तर काही तालुक्‍यात कृषी क्षेत्राला अनुकूलता असूनही त्याठिकाणी कृषी अधिकारी कर्मचारी नसल्याने त्या भागाला आर्थिक विकासाची चालना मिळत नाही.प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने जिल्ह्याचा विशेषता किनारपट्टी भाग असल्याने किनारपट्टी भागातून सिंधुदुर्गाच्या वातावरणात अनेक प्रतिकूल बदल वारंवार होत असतात. याचा थेट परिणाम येथील कृषी क्षेत्रावर दिसून येतो. प्रामुख्याने खरीप हंगामातील भात पिकासह इतर पिकावर कायम धोक्‍याची व नुकसानीची टांगती तलवार बनून राहिलेली असते. जिल्ह्याचा बराचसा भाग भातपीक क्षेत्राखाली असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक 

शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते

वाडीवस्तीवर गावापर्यंत कृषी विभागाचा अधिकारी व कर्मचारी पोहोचणे ही गरजेची बाब समजली जाते. कमी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे सर्वच भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्‍य होत नाही. परिणामी शेतीचे पंचनामे अतिवृष्टी तसेच दुष्काळी काळात पीक कापणी प्रयोग, शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिके, कीड नियंत्रण मार्गदर्शन, कार्यशाळा हे उपक्रम तसेच आपत्कालीन कार्यक्रम राबविताना त्याचा प्रभाव प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचताना मोठे अडचणीचे ठरते. याशिवाय आणखी बऱ्याच अडचणी येतात.

जिल्ह्यात  ७६ पदे  रिक्त
आठ तालुक्‍यातील दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि देवगड या चारही तालुक्‍यांना अद्यापही तालुकास्तरावर कारभार सांभाळणाऱ्या तालुका कृषी अधिकारी नसल्याने प्रभारी कार्यभार दुसऱ्या पदाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याकडे दिली आहे. याशिवाय बऱ्याच महिन्यापासून एकही अधिकाऱ्याचे पद जिल्ह्यामध्ये भरलेले नाही. शेतकऱ्यांच्या अत्यंत जवळचे किंवा मित्र म्हणून भूमिका बजावणारे कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांची जिल्ह्यात तब्बल ७६ पदे अद्यापही रिक्त आहेत.

काही दिवसांत रिक्त पदांची समस्या मार्गी

कृषी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येईल. जिल्ह्याच्या कृषी क्षेत्र विकासाच्या दृष्टीने हे पदे भरणे अत्यावश्‍यक समजून याची प्रक्रिया याआधीच सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत रिक्त पदांची ही समस्या मार्गी लागेल.
- सी. जी. बागल, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.

दृष्टीक्षेपात 
*पदनाम                        मंजूर पदे  भरलेली पदे  रिक्त पदे 

*जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी      1        0       1 
*तालुका कृषी अधिकारी                 8       2        6 
*कृषी अधिकारी                           12      1       11 
*मंडळ कृषी अधिकारी                   1      6       13 
*कृषी पर्यवेक्षक                            56     32      24 
*कृषी सहाय्यक                            249   197     52 
*एकूण                                       365    238    107

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com