baison saved village people in rajapur ratnagiri
baison saved village people in rajapur ratnagiri

कोकणात ग्रामस्थांच्या मदतीने रानगव्याला जीवदान

राजापूर (रत्नागिरी) : भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने विहीरीमध्ये बिबट्या पडल्याच्या अनेक घटना यापूर्वी तालुक्यात घडल्या आहेत. मात्र, काल (ता.10) आंगले येथील लोकवस्तीपासून काहीशा दूर असलेल्या पडक्या विहिरीमध्ये रानगवा पडल्याची घटना घडली. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने रात्रीच्या काळोखामध्ये ऑपरेशन राबवून विहीरीमध्ये पडलेल्या रानगव्याची सुखरूप सुटका करत जीवदान दिले.

याबाबत घडसलेली घटना अशी, आंगले गावापासून सुमारे दोन कि.मी. दूर अंतरावर सुमारे पंधरा फूट उंचीची पडकी विहीर असून त्यामध्ये सुमारे तीन फूट पाणी आहे. विहिरी जवळून जाणार्‍या काही ग्रामस्थांनी विहीरीमध्ये काळ्या रंगाचे कोणीतरी जनावर पडल्याचे पाहिले. सुरूवातीला त्यांनी म्हैस किंवा रेडा असण्याचा अंदाज वर्तविला. मात्र विहीरीच्या जवळ जावून पाहिल्यानंतर म्हैशीऐवजी रानगवा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

माहिती मिळताच योगेश प्रभूलकर यांनी वनविभागाशी तत्काळ संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर, राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, चिपळूणचे रामदास खोत, वी. द. झाडे, राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी, परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी प्रियांका लगड, दिपक खाडे आदी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तात्काळ ससाळे येथील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य योगेश प्रभुलकर, ग्रामस्थ आयुब मीर, बाळा लाड आदींच्या सहाय्याने विहीरीमध्ये पडलेल्या रानगव्याचे सुटका करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.

रानगवा पडलेली विहीर लोकवस्तीपासून दूर असल्याने आणि सायंकाळ झाल्याने काळोखामध्ये रानगव्याला बाहेर काढण्याचे आव्हान वनविभाग आणि ग्रामस्थांसमोर होते. त्यातच, विहीरीच्या आसपासचा परिसर दाट जंगलमय असल्याने त्या ठिकाणी जेसीबी नेणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत जेसीबी मागविण्यात आला होता. मात्र, विहीरीच्या ठिकाणी जाण्यास विलंब होणार होता. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने विहीर एका बाजूने खोदून रानगव्याला बाहेर येण्यासाठी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे तात्काळ टिकावाच्या सहाय्याने खोदण्याला सुरूवात केली. 

सुरूवातीला लोकांच्या उपस्थितीला घाबरून आक्रमक झालेला रानगवा खोदकाम करणार्‍यांच्या अंगावर चाल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तो अंगावर येतो की काय अशी भिती वाटत होती. अशातही त्यांनी खोदकाम सुरू ठेवले. काही वेळानंतर विहीरीत रानगव्याला बाहेर येण्याच्यासाठी बर्‍यापैकी मार्ग तयार करण्यात त्यांना यश आले. मात्र, विहीरीमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी असल्याने रानगव्याला बाहेर येण्यामध्ये अडचणी येत होत्या. यासाठी विहीरीत काही दगड टाकण्यात आले. यामुळे रानगवा पाण्यातून खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या मुखापर्यंत आला. बाहेर पडण्याचा मार्ग दिसताच रानगव्याने त्या मार्गाने धावत येत जंगलात धूम ठोकली. विहीरीमध्ये पडलेल्या रानगव्याला वनविभागाने ग्रामस्थांच्या सहाय्याने दिलेल्या जीवदानाबद्दल आंगले पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com