कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. 1 एप्रिल 2020 ला चिपी विमानतळ सुरू होणार असल्याची माहिती आज लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी दिली. विमानतळाचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला त्यांनी दिले.
श्री. राऊत यांनी चिपी विमानतळाला भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत एक एप्रिलपूर्वी विमानतळाचे काम पूर्ण झाले पाहिजे, त्रुटी राहू नयेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. चिपी विमानतळ एप्रिलपासून सुरू होण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
हेही वाचा - मच्छीमार एकजुटीचा विजय असो...
बैठकीनंतर श्री. राऊत म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर विमानतळाच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी बैठका घेऊन विमानतळ मार्च अखेरपर्यंत पूर्ण होऊन एक एप्रिलला सुरू झाले पाहिजे, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. जी काही प्रलंबित कामे आहेत ती दोन महिन्याच्या आत पूर्ण करावीत. त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही त्रुटी असतील त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. मार्चपूर्वी या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी, विद्युत पुरवठा होणार असून विमानतळ पूर्ण होण्यासाठी आजपासून 90 दिवसांची डेडलाईन या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. कामाला तत्काळ सुरुवात करा. केंद्रीय हवाई मंत्री कॅप्टन पुरी यांच्यासोबत बैठक झाली असून रखडलेल्या कामाला कोणत्याही प्रकारची चालढकलपणा होता कामा नये असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.''
ते म्हणाले, ""मुख्यमंत्री ठाकरे यांचे कोकणवर नितांत प्रेम आहे. या प्रेमापोटी त्यांनी चिपी विमानतळाचा विषय हाती घेतला आहे. हा प्रकल्प निधीअभावी आता रखडणार नाही. स्वतंत्र स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक निधी माझ्या खासदार निधीतून दिला जाईल. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनीसुद्धा विमानतळासाठी सर्वतोपरी निधी दिला आहे. उडानमध्ये सिंधुदुर्ग एअरपोर्ट जाहीर झालेला आहे; रद्द होणार नाही. एव्हिएशन कमिटीमध्ये मी स्वतः आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीवर माझे लक्ष राहणार आहे. या विमानतळावर उत्तर गोवा, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा ही गावे अवलंबून आहेत. या भागातील लोकांना या विमानतळाची नितांत आवश्यकता आहे. भविष्यात मोपा विमानतळ दहा वर्षे तरी होणार नाही. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून पर्यटन विकासातंर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा पर्यटन विकास करायचा आहे. दोन्ही जिल्हे जगाच्या नकाशावर पर्यटन जिल्हा म्हणून आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.'' यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना संदेश पारकर, शिवसेना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर आदींसह आयआरबीचे किरण कुमार, व्यवस्थापक अधिकारी राजेश लोणकर, जयंत डांगरे आदी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.