चिपळूण, (जि. रत्नागिरी) : जनतेने दाखविलेल्या अतूट विश्वासाबद्दल ऋण व्यक्त करणारे पत्र लिहिल्यानंतर आज येथे आयोजित जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर आळवला.
आपल्याच पक्षातील लोक माझ्या विरोधात षड्यंत्र रचत असल्याचा आरोप करत मी पक्ष सोडणार नाही; पण घरभेदी ओळखा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार जाधव म्हणाले, ‘‘शिवसेना फुटली तेव्हा गटनेता म्हणून त्या पदावर माझा दावा होता, पण त्यावेळी मला गटनेता केले नाही. तेव्हा मी फार काही बोललो नाही.
शिवसेना फुटीनंतर ज्यावेळी मुंबईत बैठक बोलावली, त्यावेळी ‘वर्षा’वर मी उद्धव ठाकरेंना सांगितले, जर आपण भाजपबरोबर जात असाल तर मी येणार नाही. राष्ट्रवादीत असताना मी मंत्री होतो, मात्र ज्येष्ठ असूनही मला इकडे आल्यावर मंत्रिपद दिले नाही.
मी त्यावेळी अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली नाही. ज्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदे दिली, त्यांनी भाजपविरोधात कधी शब्द तरी काढला का? मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. माझे पत्र व्हायरल करणारे लोक हे घरचे भेदी आहेत.’’
आमदार भास्कर जाधव म्हणाले, ‘‘उशाखाली साप घेऊन झोपता येत नाही. हे सत्य तुमच्यासमोर मला आणायचे होते म्हणून तुम्हाला एकत्र बोलावले आहे. आतापर्यंत जशी साथ दिलीत, तशीच यापुढेही खंबीर साथ द्या. तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.