यंदा 'या' फळांमध्ये होणार मोठी घट....

Impact of climate change on fruit crops kokan marathi news
Impact of climate change on fruit crops kokan marathi news

ओरोस( सिंधुदुर्ग) : नोव्हेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या पावसानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तापमान कायमच बदलत राहिले आहे. काजू, आंबा या उत्पादनासाठी पोषक वातावरण निर्माण न झाल्याने जिल्ह्यातील या दोन्ही प्रमुख उत्पादनावर तीव्र परिणाम झाला आहे. दरवर्षी मिळणाऱ्या एकूण उत्पादनाच्या काजू उत्पादन 25 टक्के ते आंबा उत्पादन 15 टक्केच मिळेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने या दोन्ही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी, अशा मागणीचा ठराव सोमवारी झालेल्या कृषि समितीच्या मासिक सभेत केला आहे.

कृषि समितीची मासिक सभा बॅ नाथ पै सभागृहात उपाध्यक्ष तथा कृषि समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रभारी कृषि अधिकारी विनायक ठाकुर, सदस्य रणजीत देसाई, अनुप्रिती खोचरे, वर्षा पवार, महेंद्र चव्हाण, अमरसेन सावंत, सुधीर नकाशे, गणेश राणे, प्रीतेश राऊळ या सदस्यांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार पुष्पसेन सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

हवामान केंद्रात कोणताही दोष नाही

मागील सभेत जिल्ह्यातील हवामान केंद्रांची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार राज्य कृषि विभागाचे तांत्रिक अधिकारी अरुण नातू यांनी जिल्ह्यात 39 मंडळ कार्यालये आहेत. या सर्व ठिकाणी स्कायमीक कंपनीची स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्यात आली आहेत. ही केंद्रे अत्याधुनिक असून त्याची नोंद विमा कंपनीला आपोआप मिळते. एखाद्या हवामान केंद्राची माहिती मिळाली नाहीतर विमा कंपनीचा प्रतिनिधी तेथे जावून तात्काळ ती दुरुस्त करीत असतो. त्यामुळे हवामान केंद्रात कोणताही दोष नसल्याचे ते म्हणाले. यावेळी विमा कंपनीच्या प्रतिनिधी उपस्थित राहिल्या होत्या. त्यांनी किती डिग्री तापमानात किती नुकसानी मिळते. किती वेगाचा वारा वाहल्या नंतर तर किती काळ अवकाळी पाऊस पडल्यावर किती प्रमाणात नुकसानी दिली जाते ? याची माहिती दिली.

 मुख्यालयात हवामान केंद्र बसवा

  यावेळी जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीत हवामान केंद्र बसविण्याची मागणी करण्यात आली. यामुळे येथील जिल्हा यंत्रणेला हवामान बदलाची वेळच्या वेळी माहिती मिळेल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायत क्षेत्रात हवामान केंद्र बसविण्याची मागणी यावेळी म्हापसेकर यांनी केली.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे वारंवार वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम येथील पिकांवर होत आहे. उत्पादन घटुन नुकसान होत आहे. त्यामुळे कोकण विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना बोलावून या बदलाची माहिती घेण्याचे यावेळी ठरले. त्यानुसार पुढील सभेत विद्यापीठ शास्त्रज्ञ बोलाविण्याचे ठरले. शासनाने जाहिर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना झाला ? असा प्रश्न विचारला असता कृषि विभागाच्या अरुण नातू यांना त्याचे उत्तर देता आले नाही. योजना राबविणाऱ्या जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक यांच्याकडे अद्यावत आकडेवारी नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   

 26 मार्च रोजी राज्य शासनाच्या कृषि विभागाने जिल्ह्यातील 100 शेतकऱ्यांची अभ्यास सहल राज्यात नेली होती. या शेतकऱ्यांची सातारा येथे व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, जेवण व राहण्याची उत्तम व्यवस्था नसल्याने काही शेतकरी मागे आले, असे महेंद्र चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. काही शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधल्यानंतर मी आ. नितेश राणे यांच्या कानावर हा विषय घातला. यावेळी आ. राणे यांनी या सर्व शेतकऱ्यांची राहण्या व जेवणाची व्यवस्था स्वतः केली, असे यावेळी चव्हाण यांनी सांगितले. यानंतर अध्यक्ष म्हापसेकर यांनी सहलीचे नियोजन करणारे अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना पुढील सभेत बोलावून घेण्याचे आदेश दिले. यावेळी आ. नितेश राणे यांनी व्यवस्था केल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com