सिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे.. 

Mahatma Jotirao Phule Farmers Debt Waiver Scheme 2019 kokan marathi news
Mahatma Jotirao Phule Farmers Debt Waiver Scheme 2019 kokan marathi news

ओरोस (सिंधुदुर्ग) :  महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे यांनी दिली. 

ऑगस्ट ते नोव्हेंबर 2019 या चार महिन्यात पडलेल्या पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 जाहीर केली आहे. त्याचा अध्यादेश 27 डिसेंबर 2019 ला काढला होता. अल्प मुदतीचे शेती कर्ज घेतलेल्या व व्याजासह मुद्दल मिळून 2 लाख रूपयां पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना यात समाविष्ट करण्यात आले आहे. शासनाने आदेश काढल्यानंतर पत पुरवठा करणाऱ्या जिल्हा बॅंक अंतर्गत येणाऱ्या विकास संस्था व व्यापारी बॅंका यांच्यामार्फत पात्र लाभार्थी निवड करीत त्यांची शासनाच्या नमुन्यात परिपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आली होती. 

माहिती ऑनलाईन पद्धतीने
माहिती भरण्याचा टप्पा पूर्ण झाल्यावर शासनाने 24 फेब्रुवारीला राज्यातील पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्‍यातील परूळे व वैभववाडी तालुक्‍यातील लोरे नं 2 या गावांतील शेतकऱ्यांची नावे असलेली 250 जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही यादी प्रसिद्ध झाल्यावर यादीत नाव असलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या ई सेवा केंद्रात जावून आधार प्रमाणीकरण करण्यास सांगितले होते. या सर्व लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. 

दुसरी यादी शासनाने 29 फेब्रुवारीला जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीत जिल्हा बॅंकेच्या 7 हजार शेतकऱ्यांसह व्यापारी बॅंकेच्या मिळून 8 हजार 609 शेतकऱ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 11 हजार 63 शेतकरी या कर्जमाफी योजनेस पात्र ठरले आहेत. यातील जिल्हा बॅंकेचे 8 हजार 4 शेतकरी आहेत. पहिली व दूसरी यादी मिळून पात्र लाभार्थी मधील 8 हजार 859 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. अद्याप 2 हजार 204 पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झालेली नाही. या शेतकऱ्यांची यादी उर्वरित टप्प्यात शासन जाहीर करण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 13 हजार 442 एवढी आहे. 

4 हजार 109 जणांचे प्रमाणीकरण 
शासनाने पहिल्या व दुसऱ्या यादीत मिळून 8 हजार 859 शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर केली आहे. जाहीर झालेल्या यादितील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणचे काम सुरु आहे. आतापर्यंत 4 हजार 109 जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप 4 हजार 750 जणांचे प्रमाणीकरण शिल्लक आहे. हे काम सुरु असल्याचे सांगळे यांनी सांगितले. 

सर्व्हरला समस्या 
शासनाने यादी जाहीर केलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वेबसाईटला जावून आधार प्रमाणित करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या महा ई सेवा केंद्रावर जावून हे प्रमाणीकरण करावे लागते; मात्र गेले काही दिवस शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या साईटच्या सर्व्हरला समस्या आहे. परिणामी आधार प्रमाणीकरण रखडल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com