ना घर का ना घाट का : आंबा उत्पादक हवालदिल.....

mango will grow on the tree itself gardeners desperate kokan marathi news
mango will grow on the tree itself gardeners desperate kokan marathi news

रत्नागिरी : मुंबईत हापूस पाठविण्यासाठी आंबा बागायतदारांना वाहतूक परवाने दिले जात असले तरीही मुंबईमध्ये ग्राहकच नसल्यामुळे दलालांकडून आंबा पाठवू नका असे निरोप येऊ लागले आहेत. ग्राहाकपर्यंत आंबा पोचवण्यासाठी पुरक वितरण प्रणाली नसल्याने बागायतदारांची मोठीच अडचण झाली असून येत्या आठ दिवसात त्याचे परिणाम व्यावसायिकांना जाणवणार आहेत. त्यामुळे आंबा झाडावरच पिकून पडून जाणार असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जात आहे.

कोरोना’ने सारे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्याचे पडसाद निरनिराळ्या पद्धतीने व्यवसाय आणि जनमानसावर उमटू लागले आहेत. कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या आंबा हंगामाच्या ऐन तोंडावर कोरोनाचा फैलाव होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशच लॉकडाऊन केल्यामुळे आंबा विकायचा कुठे असा प्रश्न व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे प्रत्येकजणं धोका पत्करण्यास तयार नाही; मात्र झाडावर तयार झालेले फळ डोळ्यापुढे पिकून गळून कुजून जाणार असल्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी आंबा वाहतूकच होत नसल्याने ती सुरू करावी अशी मागणी केली जाऊ लागली. आंबा बागायतदारांना वाहतूक परवानगी देण्याचा निर्णय झाला. तसे अर्ज व्हॉटस् अ‍ॅप किंवा ईमेलद्वारे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले.

उत्साह एक दिवसाचाच

रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पहिल्याच दिवशी 70 हून अधिक अर्ज आले. त्यांना परवानगीही दिली गेली. बहुतांश अर्ज हे स्थानिक पातळीवरील वाहतुकीचे होते. काहींनी आंबा मुंबई, पुण्यात पाठविण्यासाठी परवानगी घेतली आहे. वाहतुकीचा प्रश्न सुटला मात्र मुंबईतील व्यापार्‍यांकडून आधी आंबा पाठवू नका असे दूरध्वनीवरुन सांगितले जाऊ लागले आहे. याबाबत रत्नागिरीतील काही बागायतदारांनी मुंबईतील व्यापार्‍यांशी चर्चाही केली. आंबा पाठवला तरी तो उतरवून घेण्यासाठी पुरेसे कामगार नाहीत, विक्रीसाठी भैय्ये नाहीत आणि घेण्यासाठी ग्राहकांची कमतरता आहे अशी उत्तरे मिळू लागली आहेत. त्यामुळे आंबा बागायतदारांनी आंबे काढण्यापूर्वी मुंबईतील व्यापार्‍यांशी बोलून घ्या, असे मेसेज व्हॉटस् अ‍ॅपवरुन फिरु लागले आहेत. परिणामी आंबा काढण्यासाठी ज्या इर्षेने बागायतदार गुुरुवारी (ता. 26) सज्ज झाले, तो विश्वास गळून गेला आहे. त्यांची परिस्थिती ना घर का ना घाट का अशीच झाली आहे.

आंबा झाडावरच पिकणार

आठ दिवसानंतर मोठ्याप्रमाणात आंबा पिकायला लागणार आहे. त्यावेळीही अशीच स्थिती राहिली तर आंबा व्यावसायिकांचे कंबरडेच मोडेल. आंबा काढण्यासाठी गावातूनही कामगार येत नाहीत. तसेच मुंबईला गाडी नेण्यासाठी स्थानिक चालकांकडूनही नकार मिळत आहे. या परिस्थितीत आंबा विक्रीसाठीची साखळी तयार करण्याचे मोठे आव्हान सर्वांपुढेच राहणार आहे.

आंबा तयार झाला आहे, दहा दिवसात काढला तर तो गळून जाईल. माल सडून गेला तर पैसे कोण देणार हा प्रश्नच आहे. राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे कोणीच धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे आंबा बागायतदारांना आता शासनाकडून कोणता दिलासा मिळणार याकडेच लक्ष आहे.

- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com