अलिबाग - रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक हजार ४२२ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत, या योजनांचे काम २०२४ पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र आतापर्यंत ९५ योजनांचीच कामे पूर्ण झाली आहेत. तर ७४ योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर काही ठिकाणी अद्याप योजनांची कामे सुरूही झालेली नाहीत. त्यामुळे नळ जोडणी होऊन घराघरांत पाणी कधी येणार, असा प्रश्न जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलावर्ग विचारत आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करून सत्ताधारी पक्ष श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांकडूनच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्यासह पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर प्रत्येक तालुक्यात जाऊन कामांचा आढावा घेत आहेत.
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत हर घर नल से जल या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात दोन वर्षांपासून काम सुरू आहे. योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता अपेक्षित आहे.
योजनेच्या माध्यमातून १५ तालुक्यांमध्ये एक हजार ४२२ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील ९५ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. याशिवाय काम सुरू ना करणाऱ्या २६ योजनांचा ठेका केला असून यात पनवेल तालुक्यातील १५ योजना असून, कर्जत ३, महाड १, अलिबाग
२, उरण ३, मुरुड २ योजनांचा समावेश आहे.
गुणवत्तापूर्वक कामास प्राधान्य
जलजीवन मिशनअंतर्गत कार्यारंभ आदेश देऊनही एक वर्षांचा कालावधी उलटला तरी काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
१४ ठेकेदारांना एक वर्षांसाठी काळ्या यादीत टाकून, त्यांच्याकडून २६ कामे काढून घेतली आहेत. या २६ कामांची फेरनिविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून कामांची नियमित माहिती घेण्यात येत आहे. निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजना
जिल्ह्यात अलिबागमधील ८, कर्जत ४, महाड ४, माणगाव ११, म्हसळा ६, मुरूड ७, पनवेल १, पेण ९, पोलादपूर १२, रोहा ८, श्रीवर्धन ११, सुधागड १०, तळा ३, उरण १ अशा एकूण ९५ योजना पूर्ण झाल्या आहेत.
निकृष्ट काम करणारे ८४ कंत्राटदार
नियुक्त कंत्राटदारांपैकी निकृष्ट काम करणाऱ्या ८४ जणांची यादी तयार केली आहे, त्यांनी कामात सुधारणा न केल्यास कारवाईची तलवार टांगती राहणार आहे. दिरंगाई तसेच योग्य पद्धतीने काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा डॉ. बास्टेवाड यांनी दिला आहे.
९५ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. महिनाभरात ७४ योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना ठेकेदार-अधिकारी यांना दिल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत.
- डॉ. भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड
एक हजार ४२२ योजनांसाठी साधारण एक हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. कामांच्या वाटपापासूनच यात भ्रष्टाचार झाला आहे. ज्या योजना पूर्ण झाल्याचे दाखवले जात आहेत, त्या जुन्याच असून रंगरंगोटी करून नव्या दाखवल्या आहे. तर ज्या योजना पूर्ण होत आहेत, त्यांना पुरेसे पाणीच नसल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
संजय सावंत,
माहिती अधिकार कार्यकर्ता
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.