रापणकर मच्छीमारांमुळे वाचले 'या' जिल्ह्यातील पाच पर्यटकांचे प्राण

Rapankar Fishermen Save Life Of Five Tourist In Tarkarli
Rapankar Fishermen Save Life Of Five Tourist In Tarkarli

मालवण - तारकर्ली येथील समुद्रात बुडणाऱ्या इचलकरंजी व सांगलीतील पाच पर्यटकांना स्थानिक मच्छीमारांनी वाचविले. ही घटना साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यात एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. पाचही पर्यटकांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

याबाबतची माहिती अशी की, इचलकरंजी व सांगलीतील सुमारे 17 जणांचा ग्रुप तारकर्ली - वरचीवाडी येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यास आले होते. 12 वाजण्याच्या दरम्यान या ग्रुपमधील समीना मुजावर (वय 33 रा. सांगली), रशिदा सय्यद (वय 38 रा. इचलकरंजी), सानिया मुजावर (वय 16 रा. सांगली) रमजान सय्यद (वय 22 रा. इचलकरंजी), तौफीक सनदे (वय-30 रा. इचलकरंजी) हे पर्यटक समुद्रात अंघोळीसाठी उतरले होते.

अचानक समुद्राच्या पाण्यात ते ओढले गेले आणि बुडू लागले. हा प्रकार किनाऱ्यावरील रापणकर मच्छीमारांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ समुद्राच्या दिशेने धाव घेतली. रोहन स्कूबा डायव्हिंग सेंटरने उपलब्ध करून दिलेल्या रिंगबोया, लाईफ जॅकेटच्या साहाय्याने संजय केळुसकर, अनिल टिकम, गजा कुबल, नरेश मेतर, गुंडू मेतर, दादा कांबळी, संतोष बांदेकर, योगेश देऊलकर, गजानन कुबल, बाबा कोले, आबा देऊलकर, दादा केळुसकर या मच्छीमारांनी समुद्रात उडी घेत या पाचही जणांना किनाऱ्यावर आणले. 

यात रशिदा सय्यद यांच्या पोटात पाणी गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. स्थानिक डॉ. जितेंद्र केरकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर देवबाग ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी आदींनी रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. रशिदा सय्यद यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यासह अन्य चौघांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. 

मोह येतो जिवाशी 
दिवाळी सुटीमुळे राज्याच्या विविध भागातून पर्यटक येत आहेत. तारकर्ली, देवबागला जास्त पसंती असल्याचे दिसते. येथील नयनरम्य समुद्र पाहिल्यानंतर पर्यटकांना समुद्रस्नानाचा आनंद लुटण्याचा मोह आवरत नाही. यापूर्वीही येथील समुद्रात अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. समुद्रात न जाण्याच्या सूचना असूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. 

...तर मोठी दुर्घटना 
इचलकरंजी, सांगलीतील पुरुष व महिला पर्यटक समुद्रात अंघोळीसाठी उतरले असताना समुद्रात ओढले गेल्याने बुडाले. किनाऱ्यावर रापणकर मच्छीमार उपस्थित असल्याने त्यांनी या पाचही पर्यटकांना वाचविले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मच्छीमारांच्या प्रसंगावधानामुळेच आज या पर्यटकांचे जीव वाचल्याचे दिसून आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com