हापूसला मागणी वाढत असल्यामुळे लवकरात लवकर फळ यावे आणि त्याला चांगला दर मिळावा, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न असतात.
रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हापूसची (Hapus Mango) आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दिवसा उन्हाचा ताप जाणवत असल्यामुळे आंबा काढणीयोग्य झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांतून दिवसाला १४ हजार पेटी वाशी बाजार समितीमध्ये (Vashi Market Committee) पाठवला जात आहे. आवक स्थिर असल्यामुळे पेटीचे दर २ हजारांपासून ६ हजार रुपयांपर्यंत आहेत. पहिल्या टप्प्यातील आंबा मार्चअखेरपर्यंत मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हापूसला मागणी वाढत असल्यामुळे लवकरात लवकर फळ यावे आणि त्याला चांगला दर मिळावा, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न असतात. त्यासाठी बागायतीचे योग्य नियोजन केले जाते. त्याला निसर्गाची साथ मिळाली, तर शेतकऱ्याला चांगला दर मिळतो आणि त्याचा फायदा होतो. यंदा रत्नागिरीमधून (Ratnagiri) फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आंबापेटी पाठवण्यास आरंभ झाला.
पहिल्या पंधरवड्यात पेट्यांची संख्या कमी होती; मात्र त्यानंतर त्यात वाढ होऊ लागली. मार्चच्या सुरुवातीला उन्हाचा कडाका जाणवू लागल्यानंतर फळे तयार होण्याचा वेगही वाढला. परिणामी, आंबा काढण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू झाली. पहिल्या टप्प्यातील उत्पादन मार्चअखेरपर्यंत राहील, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात काही दिवस पेट्यांची संख्या कमी राहील. पुन्हा काही दिवस आंबा मिळेल; पण ते प्रमाणही तुलनेत कमी राहील.
गेल्या काही दिवसांत पुन्हा झाडांना मोहोर येऊ लागला आहे. त्यामधून प्रत्यक्ष उत्पादन मे महिन्याच्या अखेरीस मिळेल, असा बागायतदारांचा अंदाज आहे. शुक्रवारी (ता. ८) वाशी बाजारात विविध प्रकारच्या आंब्याच्या एकूण २१ हजार ३३ पेट्या दाखल झाल्या आहेत. त्यामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १४ हजार ८०२ पेटी वाशीत पाठवण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वसाधरण सहा हजार पेट्यांचा समावेश असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
सध्या कोकणातून येणाऱ्या हापूसची आवक वाढत आहे. दोन्ही जिल्ह्यांतून समान पेट्या येत आहेत. आखाती देशांमधील मागणी वाढल्यामुळे स्थानिक बाजारातील हापूसचे दर स्थिर आहेत. आवक वाढेपर्यंत बाजारातील दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे.
-संजय पानसरे, संचालक, वाशी बाजार समिती
ज्या झाडांना सुरुवातीला मोहोर आला नव्हता, ती झाडे मोहोरलेली आहेत. त्यामधून मे महिन्याच्या अखेरीस उत्पादन मिळेल. त्याचा फायदा किती होईल, हे आताच सांगणे शक्य नाही.
-राजेंद्र कदम, आंबा बागायतदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.