ऊस शेतीची सुरुवात दमदार

जिल्ह्याच्या अर्थकारणात भक्कम स्थानी; हमखास दरामुळे वाढला होता ओढा
Sugarcane farming  Agriculture in Sindhudurg
Sugarcane farming Agriculture in Sindhudurgsakal
Summary

सिंधुदुर्गातील कृषी क्षेत्र आंबा, काजू, नारळ, सुपारी, भात यापुरतेच मर्यादित होते. काही वर्षांपूर्वी घाटमाथ्यावरील मुख्य पीक असलेल्या उसाचा यात प्रवेश झाला. हे पीक अधिक उत्पन्न देणारे असल्याने शेतकऱ्यांचा ओढाही वाढला; मात्र आता यातही अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. याचा आढावा घेणारी ही मालिका.

वैभववाडी : जेमतेम २० ते २५ एकरात असलेली ऊस शेती डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना (असळज, ता. गगनबावडा) निर्मितीनंतर झपाट्याने वाढली. बाजारपेठेची नसलेली चिंता, हमखास दर यामुळे दरवर्षी ऊस लागवडीखालील क्षेत्रात दुप्पट-तिपटीने वाढ होत गेली. अवघ्या काही वर्षांत जिल्ह्याच्या अर्थकारणात ऊसशेतीने भक्कम जागा निर्माण केली आहे.

२०-२५ वर्षांपूर्वी ऊस हे घाटमाथ्यावरील प्रमुख पीक मानले जात होते. ऊस शेती आणि त्याला पूरक दुग्ध व्यवसायामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यालगतच्या कोल्हापूर जिल्ह्यात कायापालट झाला; परंतु त्याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकतर शेतकरी भात, नाचणी हीच पांरपरिक पिके घेत होते. त्यामुळे उत्पादनही तुटपुंजे मिळायचे. त्यातच भातपिकाला हमीभाव नव्हता. कवडीमोल दराने भातविक्री करावी लागत होती. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी भातशेतीची ओळख बनली होती. शेतकरीही जमीन पडिक राहू नये, म्हणून शेती करायचे. याच कालावधीत जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याची उभारणी २००२-२००३ मध्ये असळज (ता. गगनबावडा) येथे करण्यात आली. हा कारखाना अस्तित्वात आला, त्यावेळी जिल्ह्यातील अवघे ५० ते १०० एकर क्षेत्र ऊस लागवडीखाली होते; परंतु कारखाना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांपासून नजीक असलेल्या घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांनी या दोनही तालुक्यांत जमिनी करारावर घेऊन ऊस लागवडीस सुरुवात केली.

काही स्वतंत्र, तर काहींनी स्थानिक शेतकऱ्यांशी भागीदारी करीत ऊस शेती केली. जिल्ह्यातील जमिनीचा पोत, हवामान, पाणी आणि एकूणच वातावरण ऊसशेतीला पोषक असल्याचे अवघ्या दोन-तीन वर्षांत स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही ऊसशेतीकडील कल वाढू लागला. ज्या शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली, त्यांचे अर्थकारण सुधारत असल्याचे लक्षात आल्यानंतर इतर शेतकऱ्यांनीही ऊस लागवडीवर भर दिला. एकीकडे ऊस लागवडीसाठी अनेक शेतकरी उत्सुक होते; परंतु पाण्याची उपलब्धता तितक्या प्रमाणात नव्हती. याच कालावधीत कणकवली आणि वैभववाडी या दोन तालुक्यांतील अनेक गावे ओलिताखाली येणाऱ्या कुर्ली-घोणसरी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन अनेक गावांमध्ये पाणी पोहोचले. याशिवाय नानिवडे, तिथवली, नाधवडे, लोरे यासह अनेक लघु प्रकल्पांमध्ये पाणी साठवण होऊ लागले. त्यामुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत गेले.

ऊस शेती क्षेत्र वाढले, दरही वाढला

उसाचे क्षेत्र वाढत असताना दुसरीकडे उसाचा दरही वाढत होता. त्यातूनच लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी दुप्पट ते तिपटीने वाढ होत गेली. सुमारे १०० एकरपर्यंत असलेले उसाचे क्षेत्र सध्या १ हजार ७०० हेक्टरवर पोहोचले. आता लाखाचा टप्पा ओलांडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com