
वारसास्थळे रत्नागिरी पर्यटन क्षेत्रात आणि नवीन रोजगार निर्माण करण्यात मोलाची भर घालणारी आहेत.
आता होणार कोकणातील नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन
रत्नागिरी : जिल्ह्यात पर्यटनासाठी लाखो लोक दरवर्षी भेट देतात. कोरोना महामारीनंतरच्या काळात पर्यटन उद्योगाचा व्याप वाढणार आहे. त्याकरिता व पर्यटन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन व निसर्गयात्री संस्थेने सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन अभियान हाती घेतले आहे. याचा प्रारंभ उद्या (27) जागतिक पर्यटन दिनी होणार आहे.
यंदा जागतिक पातळीवर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन ही संकल्पना जागतिक पर्यटन दिनानिमित्त स्वीकारण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे गावात असलेल्या जागतिक दर्जाच्या नैसर्गिक चुंबकीय विस्थापन, जिवाष्म, जैवविविधता आणि सांस्कृतिक वारसा कातळ खोद चित्र, भार्गवराम मंदिर या स्थळांचे जतन केले जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी सहकार्यांसमवेत हजारो कातळशिल्पांचा शोध घेतला आहे. आता त्याला पर्यटनाची जोड देण्यात येणार आहे.
हेही वाचा - शिक्षण क्षेत्राचे ‘लॉक’ काढायला हवे
आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी दिशादर्शक फलकांवर प्रातिनिधिक चिन्ह असतात तशीच चिन्हे या पर्यटन दिनापासून रत्नागिरीमध्ये वापरण्यात येणार आहेत. त्याची सुरवात उद्यापासून केली जाईल. जिल्ह्यात अनेक ठिकाणे वारसास्थळ या प्रकारात मोडतात. त्याचबरोबर निसर्गयात्री संस्थेने आपल्या संशोधनात्मक कामातून रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक दर्जाची अनेक वारसास्थळे शोधून यात मोलाची भर घातली आहे. यासंदर्भात परिषद घेऊन त्या माध्यमातून ही स्थळे जतन करण्यासाठी काय केले पाहिजे, याचा आराखडाही बनवण्यात आला आहे. ही वारसास्थळे रत्नागिरी पर्यटन क्षेत्रात आणि नवीन रोजगार निर्माण करण्यात मोलाची भर घालणारी आहेत.
पर्यटनदिनी श्रमदान व फलक अनावरण
उद्या (27) सकाळी 8 वाजता रत्नागिरीतून निघून देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथे जाऊन परिसरातील वारसास्थळांचे दर्शन व माहिती, श्रमदान, वारसास्थळे मार्गदर्शक फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात इच्छुकांनी जरूर सहभागी व्हावे, त्यासाठी सुहास ठाकुरदेसाई, सुधीर रिसबूड यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन निसर्गयात्री संस्थेने केले आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असे संस्थेने स्पष्ट केले.
हेही वाचा - कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम राज्यभर राबवायला हवा ; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
चुंबकीय विस्थापन
राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे येथे 2.25 मीटर त्रिज्येचे वर्तुळ काढण्यात आले आहे. येथे चुंबकीय विस्थापन आढळते. ज्याठिकाणी मनुष्याकृती कोरली आहे तिथे चुंबकसूची पूर्णपणे विरूद्ध दिशा दाखवते. विशिष्ट अणुरचनेमुळे चुंबकसुई स्थिर राहत नाही. ती विरूद्ध दिशा दाखवते, हे स्पष्ट झाले आहे.
संपादन - स्नेहल कदम
Web Title: Tomorrow Tourism Day Celebrated Konkan Activity Generated Nature Places Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..