क्रिकेटवर वर्चस्व गाजविलेल्यांवर वर्चस्व गाजविणारी टीम इंडिया

article on Indian Team by Shailesh Nagwekar
article on Indian Team by Shailesh Nagwekar

एकेकाळी क्रिकेटविश्वावर वर्चस्व गाजविणाऱ्या; परंतु आता तितके ताकदवान नसले, तरीही वेस्ट इंडीजविरुद्ध सलग दहा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम विराट कोहलीच्या संघाने केला आहे. समोर प्रतिस्पर्धी किती ताकदीचा आहे, यापेक्षा केलेला खेळ तुमच्या कामगिरीचा निदर्शक असतो. त्यामुळे क्रिकेटजगतात सध्या विजयी पताका झळकविणारा भारतीय संघ एखादा सामना हरला तर आश्‍चर्य वाटावे, अशी स्थिती आहे.

जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या हे मॅचविनर संघात नसताना त्यांच्या जागी खेळण्याची संधी मिळालेल्यांनी भारतीय संघाची दुसरी फळीही भक्कम असल्याचे सिद्ध केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ज्या चौथ्या क्रमांकावरून भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेत अडचणीत आला होता, तो आता श्रेयस अय्यरमुळे संपुष्टात आला, असे म्हणता येईल. थोडक्‍यात काय तर, भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावंत खेळाडूंचा झरा अव्याहत वाहतो आहे. त्यामुळेच, मालिका विजयांचे देदीप्यमान यश साकार होत असते. 

आधी दक्षिण आफ्रिका, नंतर श्रीलंका आणि आता वेस्ट इंडीजला टीम इंडियाने चितपट केले आहे. पण, पराभवातून जशा काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, तसे विजयातूनही बोध घेण्यासारखे काही प्रसंग असतात आणि याची जाणीव असते त्याचे पाय टीम इंडियासारखे कायम जमिनीवर असतात. याच वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत दुसरा सामना गमावल्यानंतर तिसऱ्या लढतीत सर्व ताकद पणाला लावून भारताने मालिका विजय मिळविला होता. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर प्रतिष्ठा पणास लागल्यासारखा खेळ करून दुसरा सामना जिंकला.

विजयाचा रथ चौफेर धावण्यासाठी खेळाडूंची क्षमताच नव्हे, तर विजिगीषू मानसिकताही परिणामकारक ठरत असते. विराटसारखा कर्णधार आणि रवी शास्त्रीसारखा "हेडमास्तर' असल्यामुळे भारतीय संघ सदैव जागरूक असतो. सध्या आपल्या क्षेत्ररक्षणात ढिलाई होत आहे. त्यामुळे कडवा प्रतिकार करण्याची वेळ आली, ही वस्तुस्थिती आहे. सातत्याने खेळत असताना असे दोष निर्माण होत असतात. पण, येत्या काळात वेळ मिळेल तेव्हा हे दोषही दूर होतील, हे नक्की. एकूणच, विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील हार सोडल्यास 2019 हे वर्ष टीम इंडियासाठी अजेय यश मिळवून देणारे ठरले. विंडीजवरील विजयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com