Jasprit Bumrah : रिझवानची दांडी अन् भारतानं भाकरी फिरवली; टीम इंडियाच्या विजयाची ही आहेत 5 कारणं

India Vs Pakistan : भारतानं फक्त 119 धावा डिफेंड केल्या. पाकिस्तानला ऑल आऊट न करताही सामना जिंकून दाखवला.
Jasprit Bumrah
Jasprit Bumrah Ind VS pak esakal

IND vs PAK Jasprit Bumrah : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावून देखील भारताने विजय मिळवल्यामुळे हा विजय फार खास आहे. भारताने पाकिस्तानसमोर फक्त 120 धावांचे आव्हान ठेवलं होतं. पाकिस्ताननं देखील चांगली सुरूवात केली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्लेनंतर दमदार गोलंदाजी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहनं 4 षटकात फक्त 14 धावा देत 3 तर हार्दिक पांड्यानं 2 विकेट्स घेतल्या.

मात्र सामन्याचा टर्निंग पॉईंट हा जसप्रीत बुमराहचा मोहम्मद रिझवानला टाकलेला भन्नाट बॉल ठरला. त्यानं 31 धावा करणाऱ्या रिझवानची दांडी गुल केली अन् पाकिस्तानचे रनरेट ड्रॉप झालं. जर रिझवान टिकला असता तर भारतासाठी हा सामना जिंकणं अवघड झालं असतं. बुमराहच्या या विकेटसोबतच भारताच्या विजयाची काही ठराविक कराणं आहेत.

Jasprit Bumrah
Ind Vs Pak T20 WC24 : बुमराह ठरला पाकिस्तानचा कर्दनकाळ! भारतानं 119 धावा डिफेंड करत पाकिस्तानचं केलं जवळपास पॅक अप

1 - फिअरलेस बॅटिंग

भारताने 20 षटकात सर्वबाद 119 धावा केल्यानंतर चाहते भारताने खराब फलंदाजी केली असं निश्चित म्हणणार. मात्र न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सरासरी 103 धावा झाल्या होत्या. भारताने त्यापेक्षाही जास्त धावा केल्या होत्या.

भारताने चेंडू नवा असताना भराभर धावा करून घेतल्या. त्यानंतर पाकिस्तानने चेंडू थोडा जुना झाल्यावर वर्चस्व गाजवले. आधीच असमान उसळी घेणाऱ्या पिचवर पावसामुळे चेंडू जास्तच थांबून येत होता. त्याचा फायदा पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगल्या प्रकारे घेतला.

भारताने जर मधल्या फळीत अजून 20 - 30 धावा केल्या असत्या तर सामना एकतर्फी झाला असता. मात्र भारताची मधली फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली. भारतानं अवघ्या 7 धावात 4 फलंदाज गमावले.

भारताच्या फलंदाजीत ऋषभ पंतची खेळी खास राहिली. त्यानं सातत्यानं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. त्याला अनेकवेळा जीवनदान मिळालं. मात्र पंतच्या याच 31 चेंडूत केलेल्या 42 धावांमुळे भारत पाकिस्तानसमोर बॉल टू रनचं टार्गेट ठेवू शकला. पंतनंतर भारताकडून फक्त रोहित शर्मा आणि अक्षर पटेलच दुहेरी आकडा गाठू शकले होते.

2 - रोहितचे बॉलिंग चेंजेस

फलंदाजीत धावा थोड्या कमी झाल्या असल्या तरी त्याची कमी रोहितनं बॉलिंग चेंजेसमध्ये केली. त्यानं भारताच्या गोलंदाजांना छोटे स्पेल दिले. त्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज भारताच्या एकाही गोलंदाजासमोर सेट झाले नाहीत. भारतानं देखील पॉवर प्लेनंतर पाकिस्तानी फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.

रोहितनं जसप्रीत बुमराहची षटकं राखून ठेवली. त्याला माहिती होतं की सामना दिसतो तितका सरळ नाही. स्लॉग ओव्हरमध्ये बुमराहची गरज लागणार आहे. ज्यावेळी चेंडू जुना झाला अन् खेळपट्टीवर चेंडू थांबून येऊ लागला त्यानंतर बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांच्या मुसक्या आवळल्या. रोहितने आपल्या फिरकीपटूंचा देखील खुबीने वापर केला.

Jasprit Bumrah
Rohit Sharma : शाहीनला पहिल्याच षटकात षटकार मारत रोहितनं इतिहास रचला! मात्र डावखुऱ्या आफ्रिदीने घेतला बदला

3 - ठराविक अंतराने घेतल्या विकेट्स

पाकिस्तानने चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला तरी भारताने त्यांचे रनरेट नियंत्रणात ठेवले होते. पाकिस्ताननं 10 षटकात 2 बाद 57 धावा केल्या होत्या. जरी पाकिस्ताननं सामन्यावर पकड निर्माण केली असं वाटत असलं तरी खेळपट्टीचा नूर पाहता 10 षटकानंतर धावा करणं तितकं सोपं नव्हतं.

भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला मोठी भागीदारी रचू दिली नाही. भारताने ठराविक अंतराने विकेट्स घेत पाकिस्तानला सतत दबावाखाली ठेवलं. नव्या फलंदाजाला या खेळपट्टीवर जम बसवणं जिकिरीचं जात होतं.

जसप्रीत बुमराहने तर बाबर आझम, मोहम्मद रिझवान इफ्तिकार अहमद यांची विकेट घेत पाकिस्तानला मोठ मोठे धक्के दिले. पांड्यानंही आपला भुमिका चोख पार पाडत शादाब आणि झमानची शिकार केली. मोहम्मद सिराजला विकेट घेण्यात यश आलं नाही. मात्र त्यानं 4 षटकात फक्त 19 धावा देत सपोर्टिव्ह रोल उत्तमप्रकारे निभावला.

4 - स्लॉग ओव्हरमध्ये टिच्चून मारा

भारताने सामन्यावर खरं नियंत्रण 15 षटकानंतर ठेवलं. रोहितने खुबीने सीमारेषेवर फिल्डिंग लावली. त्याला अनुसरून गोलंदाजांनी गोलंदाजी केली. पाकिस्तानला षटकार, चौकार सोडाच दुहेरी धाव घेण्यापासूनही रोखले.

भारताने बॉल अन् रन्स यांच्यातील अंतर वाढवलं. त्यामुळं पाकिस्तानच्या गोटात पॅनिक निर्माण झालं अन् त्यांचे एका पाठोपाठ एक शिलेदार पॅव्हेलियन गाठू लागले.

5 - कमी कॅच सोडणं

भारतानं आज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला जीवनदान दिलं होतं. मात्र पाकिस्तानच्या तुलनेत भारताने फक्त 2 कॅच सोडले. पाकिस्तानने एकट्या ऋषभ पंतचे तीन कॅच सोडले. अर्शदीपला देखील जीवनदान दिलं. याचा फायदा भारताला झाला. पंतच्या 42 धावांच्या खेळीमुळं भारतानं 119 धावा उभारल्या.

भारतानेही देखील सुरूवातीला कॅच सोडले मात्र ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंगने दबावाच्या वेळी झेल पकडत पाकिस्तानला पराभवाच्या खाईत लोटलं.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com