मेलबर्न : भारतीय संघ येत्या नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून तब्बल ३२ वर्षानंतर तेथे प्रथमच पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या पहिल्या दोन क्रमांकांवर विराजमान असलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक द्वंद्व झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील या कसोटी मालिकेची उत्सुकता वाढू लागली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम पुढील महिन्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होईल, असे वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिले आहे.
पुढचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे होतील, असे या वृत्तात म्हणण्यात आले आहे. बॉक्सिंग डे आणि नववर्ष याचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी मेलबर्न आणि सिडनी ही दोन शहरे अखेरच्या दोन सामन्यांसाठी ठेवण्यात आली आहेत. अॅडलेड येथील सामना प्रकाशझोतात होईल.
भारतीय संघ ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. या अगोदर १९९१-९२ मध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका झाली होती, त्यात ऑस्ट्रेलियाने ४-० अशी बाजी मारली होती.
भारताचे ऑस्ट्रेलियातील गेल्या दोन मालिका प्रत्येकी चार सामन्यांच्या झाल्या होत्या. २०१८-१९ आणि २०२०-२१ मधील या दोन्ही मालिका भारताने जिंकलेल्या आहेत. २०१८-१९ मधील मालिकेत पर्थ येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १४६ धावांनी विजय मिळवून ऑस्ट्रेलियामध्ये आपला दरारा निर्माण करण्यास सुरुवात केली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.