चेन्नई : महान खेळाडू व कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडून २०२२मध्येच चेन्नई सुपरकिंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात येण्याचे संकेत मिळाले होते. स्वत: ऋतुराज याने कोलकताविरुद्धच्या लढतीनंतर याबाबत माहिती दिली.
धोनीकडून सांगण्यात आल्यानंतर नेतृत्वपदासाठी तयार होतो, असेही त्याच्याकडून पुढे सांगण्यात आले. ऋतुराज पुढे म्हणाला, धोनी व मी सराव करीत होता. तेव्हा धोनी माझ्याकडे आला आणि कर्णधारपदाबाबत माहिती दिली.
त्यानंतर आमच्या या विषयावर कधीही प्रदीर्घ चर्चा झाली नाही. मी स्वत:वर कोणताही दबाव घेतला नाही. संघाबाहेरील व्यक्तींना धोनीची जागा घेणे म्हणजे कठीण काम आहे, असे वाटते; पण संघ ज्या संस्कृतीत तयार झाला आहे, तीच संस्कृती पुढे चालवण्याचा प्रयत्न करीत आहे. मी माझ्या परीने पुढे जात आहे.
ऋतुराज गायकवाड याप्रसंगी आवर्जून म्हणाला की, धोनीने माझ्याकडे २०२४पर्यंत चेन्नईचे नेतृत्व येण्याची कल्पना दिली होती; पण मला यामुळे कोणताही धक्का बसला नाही किंवा माझ्यासाठी हे काही नवे नव्हते.
महाराष्ट्राच्या संघासाठी मी नेतृत्व केले होते. त्यामुळे सामन्यात होत असलेल्या बदलाबाबत माहिती होते. मी चेन्नई संघासोबत जोडला गेलो तेव्हा मला मोकळीक दिली होती. त्यामुळे मीही संघातील इतर खेळाडूंना मनाजोगता खेळ करण्यासाठी मोकळीत देतो. स्वत: क्रिकेटचा आनंद घेतो.
चेन्नईने सोमवारी कोलकता संघाचा विजयरथ रोखला. रवींद्र जडेजाने १८ धावा देत तीन फलंदाज बाद करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याचीच सामनावीर म्हणून निवड झाली. रवींद्र जडेजाने याचदरम्यान आयपीएलमध्ये मोठा पराक्रम करून दाखवला. एक हजारांपेक्षा अधिक धावा करणारा, १०० पेक्षा अधिक विकेट मिळवणारा व १०० झेल टिपणारा जडेजा हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव खेळाडू ठरला आहे.
चेन्नईतील स्टेडियमची खेळपट्टी ओळखण्यात अपयशी ठरल्याची भावना कोलकता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने व्यक्त केली. रवींद्र जडेजा यानेही आपले मत व्यक्त करताना म्हटले की, आम्ही येथे कसून सराव करतो. येथील खेळपट्टीबाबत आम्हाला चांगलीच माहिती आहे. प्रतिस्पर्धी संघ दोन ते तीन दिवस आधी येथे येतात. त्यामुळे त्यांना खेळपट्टीचा रागरंग ओळखता येत नाही.