धैर्याने देणार कोरोनाला 'खो'! मराठमोळ्या मातीचा खेळ पुन्हा होणार सुरू; वाचा बातमी सविस्तर

धैर्याने देणार कोरोनाला 'खो'! मराठमोळ्या मातीचा खेळ पुन्हा होणार सुरू; वाचा बातमी सविस्तर


मुंबईः खो-खो या मराठमोळ्या खेळाचा शरीरसंपर्क खेळाच्या प्रकारात समावेश करण्यात आला असला, तरी तो सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी संघटकांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार खेळाच्या चौकटीतच सुरक्षित अंतराचे मापदंडाचे पालन करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विविध खेळ सुरू करताना त्यांची शरीरसंपर्क नसेलेले, 

कमी शरीरसंपर्क तसेच जास्तीचा शरीर संपर्क या गटात विभागणी करण्यात आली आहे. त्यात खो-खोचा समावेश संपर्क खेळांच्या यादीत करण्यात आला आहे. ""खो-खो हा खूपच कमी संपर्क असलेला खेळ आहे. त्यात पाठलाग करणारा खेळाडू आक्रमकाला स्पर्श करतो; तसेच खो देताना स्पर्श होतो; मात्र हे स्पर्श प्रामुख्याने पाठीवर असतात," याकडे भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी लक्ष वेधले. 

तीन मिनिटांच्या ब्रेकमध्ये खेळाडूंना हात सॅनिटाईज करता येतील तसेच त्यांना चेहरा स्वच्छही करण्याची सूचनाही देण्याबाबत विचार करीत आहोत. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडे लक्ष देण्यात येईल. अर्थात याबाबत डॉक्‍टरांचा सल्लाही घेण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा होण्यापूर्वी खेळाडूंची चाचणी घेण्याचाही आम्ही विचार करीत आहोत. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी थर्मल स्क्रीनिंग करणे सहज शक्‍य आहे. 
खो-खो हा खेळ सुरक्षित आहे. आक्रमक करीत असलेल्या खेळाडूत तसेच संरक्षण करीत असलेल्या खेळाडूंत खेळ सुरू असताना अंतर असतेच. बाद होत असलेल्या खेळाडूलाही स्पर्शच होत असतो. खो-खो खेळाडूंचा स्पर्श सातत्याने पोलला होत असतो. त्याचे निर्जंतुकीकरण नियमितपणे करीत राहिले, तर खेळ नक्कीच सुरक्षित होईल, असे जाधव यांनी सांगितले. 
संरक्षण करणाऱ्या संघातील काही खेळाडू बाहेर असतात. त्यांच्यात सुरक्षित अंतर नक्कीच असायला हवे. त्यांची व्यवस्था राखीव क्षेत्रात त्या ठिकाणी हे खेळाडू राहू शकतील. त्यांच्यात तीन फुटांचे सुरक्षित अंतर सहज ठेवता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. 

राज्य स्पर्धा दोन टप्प्यांत 
खो-खोच्या एका संघात बारा खेळाडू तसेच किमान दोन पदाधिकारी असतात. त्याशिवाय एका सामन्याला पंच, गुणलेखक यांसारख्या सहा जणांची गरज असते. या परिस्थितीत स्पर्धेपूर्वी खेळाडूंची चाचणी, त्यांचा खर्च खूपच जास्त होऊ शकतो. त्यासाठीच राज्य संघटना आपली स्पर्धा दोन टप्प्यांत घेण्याचा विचार करीत आहे. राज्य संघटनेस 24 जिल्हे संलग्न आहेत. चार जिल्ह्यांचा एक गट करता येईल. त्यांची एक स्पर्धा होईल. त्यातील विजेता संघ मुख्य स्पर्धेस पात्र ठरेल. ही गटवारी अर्थातच यापूर्वीच्या राज्य स्पर्धेतील कामगिरीनुसार असू शकेल. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य संघटना एखाद महिन्यात घेईल, असे जाधव यांनी सांगितले. 

सुरक्षित असलेला खो-खो 
- खो-खोच्या दोन स्तंभरेषामधील अंतर 24 मीटर 
- हे अंतर पुरुष, महिला, कुमार तसेच कुमारी गटासाठी 
- किशोर तसेच किशोरी गटासाठी हेच अंतर 20 मीटर 
- आक्रमक करणारे आठ खेळाडू मैदानात बसतात, तर एकाचे आक्रमण 
- या दोन बसलेल्या खेळाडूत वरिष्ठ तसेच कुमार गटांसाठी अंतर 35 सेंटिमीटर 
- किशोर -किशोरी गटासाठी हेच अंतर 30 सेंटिमीटर 
- मुख्य मैदानापासून गुणलेखक किमान दीड मीटर दूर 
- मुख्य मैदानापासून मैदानाबाहेरील खेळाडू किमान एक मीटर दूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com