हांग् चौऊ - भारतीय खेळाडूंनी यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये २८ सुवर्णपदकांसह एकूण १०७ पदकांवर मोहोर उमटवत ऐतिहासिक कामगिरी केली. या देदीप्यमान यशानंतर भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, केंद्र सरकारकडून २०३६ मधील ऑलिंपिकच्या यजमानपदाची तयारी करण्यात येत आहे. मला असे वाटत आहे की, भारत आता यजमानपदासाठी दावेदार म्हणून तयार झाला आहे.
पी. टी. उषा म्हणाल्या, ‘‘आपल्या देशाच्या पंतप्रधानांना खेळांमध्ये रस आहे. केंद्र सरकार खेळ व खेळाडूंच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांच्या अपार मेहनतीमुळे भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदकांची शंभरी ओलांडता आली.
२०२४ मधील पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारत जास्त पदके जिंकेल, असा विश्वास आहे. जास्त पदकांवर नाव कोरल्यास भारत आपोआपच यजमानपदाचा दावेदार होऊ शकतो. भारताने २०३६ मधील ऑलिंपिकच्या यजमानपदाच्या दावेदारीसाठी पावले उचलायला हवीत.’’ ऑलिंपिकच्या यजमानपदाची निवड करण्यासाठी पारंपरिक बोली पद्धत अवलंबली जात होती, पण आता ही पद्धत मागे टाकण्यात आली आहे. नव्या पद्धतीनुसार जो देश यजमानपदासाठी उत्सुक आहे,
त्या देशाने प्रस्ताव ठेवल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या आयोगाद्वारे हा प्रस्ताव कार्यकारी मंडळाकडे सोपवण्यात येईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्रामध्ये मतदानाद्वारे यजमानपदाच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात येईल.
अधिक खेळांमध्ये पदके
पी. टी. उषा यांनी भारतीय खेळाडूंच्या आशियाई स्पर्धेतील कामगिरीचे कौतुक करताना म्हटले की, ॲथलेटिक्समध्ये भारताने तब्बल २९ पदके जिंकली. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. भारतीय खेळाडूंनी यंदा अधिक खेळांमध्ये पदकांची कमाई केली. ही बाबदेखील उल्लेखनीय आहे.
२२ खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी विजयाचा झेंडा रोवला. भारतीय खेळांच्या दृष्टिकोनातून हे नक्कीच चांगले लक्षण आहे. पी. टी. उषा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमान असलेल्या चीनचेही कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘चीनकडून याआधीही मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यांच्याकडे यजमानपदाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आयोजनात कसर कमी पडेल असे वाटत नव्हते. यंदाही त्यांच्याकडून यशस्वी आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी चुका झाल्या, पण मोठ्या स्पर्धांच्या आयोजनाप्रसंगी अशा छोट्या चुका होत असतात. काही ठिकाणी त्यांच्याकडून बदलही करण्यात आले.,’
आशियाई स्पर्धा अंतिम पदकतालिका (अव्वल पाच)
देश सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण
चीन २०१ १११ ७१ ३८३
जपान ५२ ६७ ६९ १८८
कोरिया ४२ ५९ ८९ १९०
भारत २८ ३८ ४१ १०७
उझबेकिस्तान २२ १८ ३१ ७१
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.