भारतीय संघाने न्यूझीलंडला दिला व्हाईटवॉश
IND vs NZ, 3rd T20 : विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता न्यूझीलंडला भारतीय संघाने टी२० मालिकेत ३-० ने पराभूत केले. पहिल्या दोन सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. रोहितच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने १८४ धावा केल्या. पण न्यूझीलंडला मात्र १११ धावाच करता आल्या आणि भारताने तिसरा सामना ७३ धावांनी जिंकला. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्याच मालिकेता भारताला निर्भेळ यश मिळाले. त्यानंतर द्रविडने भारतीय खेळाडूंना विशेष सल्ला दिला.
"हा मालिका विजय नक्कीच खास आहे. संपूर्ण मालिकेत आम्ही चांगली कामगिरी केली. माझ्या पहिल्याच मालिकेत इतकं यश मिळालं ही गोष्ट चांगली आहे, पण तरीही आम्हाला आमचे पाय जमिनीवर ठेवावे लागतील. वर्ल्डकपनंतर अवघ्या दोन दिवसात भारतात येणं आणि पुढील सहा दिवसात तीन सामने खेळणं ही बाब न्यूझीलंडसाठी सोपी नव्हती. त्यामुळे या मालिकाविजयाची हवा डोक्यात जाऊ न देता आपण पुढे नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत", अशी ताकीद द्रविडने दिली.
"या मालिकेत युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली हे पाहून आनंद झाला. आतापर्यंत फारसं क्रिकेट खेळण्याची संधी न मिळालेल्या खेळाडूंना आम्ही संघात संधी दिली. त्याजागी अनुभवी क्रिकेटर्सना आराम देण्यात आला. त्यांच्यातील बलस्थाने आणि उणीवा समजल्या. आता त्यानुसार सुधारणा करण्यावर भर दिला जाईल. आमच्याकडे अनेक पर्याय आहेत याचा मला आनंद. त्या पर्यायांचा आम्ही योग्य वापर नक्कीच करू", असंही द्रविडने स्पष्ट केलं.
"आतापासून ते पुढील टी२० वर्ल्ड कपपर्यंत खूप मोठा हंगाम भारतीय संघाला खेळायचा आहे. अशा वेळी अनुभवी खेळाडूंना किती वेळा संघात स्थान द्यायचं आणि किती वेळा आराम द्यायचा याचं नियोजन महत्त्वाचं आहे. कसोटी मालिकेसाठी या संघातील ३ किंवा ४ खेळाडूच जाणार आहेत. त्यामुळे इतरांना हा विजय हवा तेवढा एन्जॉय करू दे", असं द्रविड म्हणाला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.