पल्लिकेले - सुमार क्षेत्ररक्षण, त्यात पावसामुळे आलेले सारखे व्यत्यय... अशा अस्थिर परिस्थितीवर रोहित शर्मा (७४) आणि शुभमन गिल (६७) यांच्या शानदार नाबाद फलंदाजीचा दिलासा मिळाला. त्यामुळे भारताने नेपाळवर १० विकेटनी मात केली आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची ‘सुपर फोर’ फेरी गाठली.
या सामन्यात पहिल्या दहा षटकांत भारताने तीन झेल सोडले, मैदानी क्षेत्ररक्षणातही चुका होत होत्या. त्यात नेपाळने तब्बल ४८.१ षटके फलंदाजी करून २३० धावा उभारल्या आणि भारतीय गोलंदाजी काहीशी निष्प्रभ ठरवली, परंतु पावसामुळे ‘डकवर्थ लुईस’च्या नियमानुसार मिळालेले २३ षटकांतील १४५ धावांचे आव्हान २०.१ षटकात पार केले.
सुपर फोर फेरीचे महत्त्वाचे आव्हान सुरु होताना रोहित शर्मा आणि गिल यांना सापडलेला सूर दिलासा देणारा ठरला. विजयासाठी २३१ धावांचा पाठलाग करणे भारतीय फलंदाजीला कठीण आव्हान नक्कीच नव्हते. त्यातून गोलंदाजी नेपाळची होती. पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबला. मैदानाच्या कर्मचाऱ्यांनी अविश्रांत मेहनत करून कव्हर्सवर पडलेले पावसाचे पाणी दूर केले आणि रात्री सव्वादहा वाजता खेळ परत चालू केला.
वेळ वाया गेल्याने २७ षटके कापली गेली. अखेर २३ षटकात १४५ धावा करायला भारतीय फलंदाज मैदानात उतरले. गिल आणि रोहित शर्माने गोलंदाजीचा थोडा अंदाज घेऊन कोणतीही घाई-गडबड न करता धावा जमा करणे चालू केले. रोहितने ५९ चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकार मारले. त्या अगोदर रविवारी रात्री पडलेल्या पावसाने सामन्याच्या दिवशी विश्रांती घेतली. संयोजकांनी अचाट कष्ट करताना पल्लिकेलेचे संपूर्ण मैदान आच्छादले होते. केवळ त्या कष्टांमुळेच सामना वेळेवर चालू झाला. रो
हित शर्माने सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करायचा रोहितचा निर्णय योग्य वाटला. सामना चालू झाल्यावर मोहंमद शमीने टाकलेल्या पहिल्याच षटकात श्रेयस अय्यरने सोपा झेल सोडला. दुसऱ्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने अजून सोपा झेल सोडला. त्याच्या पुढच्या तिसऱ्या षटकात विकेट किपर ईशान किशनने सोपा झेल सोडून कमाल केली. २० चेंडूत तीन सोपे झेल सोडणाऱ्या भारतीय संघाला बघवत नव्हते.
नेपाळच्या सलामीच्या फलंदाजांनी त्याचा नुसता फायदा घेतला नाही तर कुशल भुर्टेलने भन्नाट फटके मारले मारले. त्याने सिराजला मारलेला एक हुकचा फटका मैदानाबाहेर अजून लांब जाऊन पडला. अखेर १०व्या षटकात भुर्टेल बाद झाला. जोडी फोडण्याचे काम शार्दूल ठाकूरने केले. दुसरा सलामीचा फलंदाज आसिफ शेख झकास फलंदाजी करत राहिला. त्याला म्हणावी तशी साथ बाकीच्या फलंदाजांनी दिली नाही. रवींद्र जडेजाला खेळताना त्यांचा अंदाज चुकत राहिला. जडेजाने तीन फलंदाजांना बाद करून धावफलकाला ब्रेक्स लावले. अर्धशतक करून आसिफ बाद झाला.
आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सोमपाल कामीने ४८ धावांची सुंदर खेळी केल्याने नेपाळला ४८.१ षटकात सर्वबाद २३० धावांचे चांगले आव्हान उभारता आले. सिराज आणि जडेजाने प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केले.
संक्षिप्त धावफलक
नेपाळ : ४८.२ षटकांत सर्वबाद २३० (कुशल भुर्टेल ३८ -२५ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, आसिफ शेख ५८ -९७ चेंडू, ८ चौकार, गुलशन झा २३, दिपेंद्रसिंग ऐरी २९, सोमपाल कामी ४८ -५६ चेंडू, १ चौकार, २ षटकार, मोहम्मद सिराज ९.२-१-६१-३, हार्दिक पंड्या ८-३-४१-१, शार्दूल ठाकूर ४-०-२६-१, रवींद्र जडेजा १०-०-४०-३) पराभूत वि. भारत : २०.१ षटकांत बिनबाद १४७ (रोहित शर्मा नाबाद ७४ - ५९ चेंडू, ६ चौकार, ५ षटकार, शुभमन गिल नाबाद ६७ - ६२ चेंडू, ८ चौकार, १ षटकार)
(डकवर्थ लुईस नियमानुसार २३ षटकांत १४५ धावांचे आव्हान)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.