Shoaib Bashir Visa : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका आजपासून हैदराबाद येथे सुरू झाली. तत्पूर्वी मालिका सुरू होण्यापूर्वीच इसीबी आणि भारत सरकार यांच्यात वादाचा प्रसंग उद्भवला होता. पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश खेळाडू शोएब बशिरच्या व्हिसा प्रकरण गेले काही दिवस चर्चेत होते.
भारताने आधी बशिरचा व्हिसा नाकारला अन् त्यानंतर पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी त्याला व्हिसा देण्यात आला. यावरून आता उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा माजी खेळाडू व्यंकटेश प्रसादने इंग्लंड क्रिकेट बोर्डावर तिखट शब्दात टीका करत या संपूर्ण प्रकरणात इसीबीचाच दोष असल्याचा दावा केला.
व्यंकटेश प्रसादने ट्विट केले की, 'शोएब बशिरच्या व्हिसा युनायटेड किंगडमध्येच स्टॅम्प होणं गरजेचं होतं. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाने शोएब बशिरला युएईला पाठवलं. त्यांना वाटलं की तिसऱ्या देशात व्हिसा स्टॅम्प होईल. त्यांनी योग्य प्रक्रिया पार पाडली नाही. त्यानंतर त्यांनी जुन्या इंग्लिश पद्धतीनं खोटं रडगाणं सुरू केलं. या संपूर्ण प्रकरणात कोणी दोषी असेल तर ते इसीबी आहे.'
मिळालेल्या माहितीनुसार शोएब बशिरच्या व्हिसा प्रक्रियेत युके सरकारने उडी घेतली होती. त्यांनीच हे प्रकरण फास्ट ट्रॅक केलं. जरी बशिर इंग्लंडच्या संघात दाखल होण्यास उशीर होत असला तरी इंग्लंडच्या संघात चार फिरकीपटू आहेत. पहिल्या कसोटीत टॉम हार्टली हा पदार्पण करणार आहे. तर जो रूट देखील ऑफ स्पिन गोलंदाजी करतो.
भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटू अत्यंत प्रभावशाली ठरतात. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की ते कोणत्या खेळपट्टीवर खेळण्यास सज्ज आहेत. तो सामन्यापूर्वी म्हणाला होता की, 'भारतात कायम चेंडू फिरकी घेणार याचा तुम्ही विचार करत असता. मात्र आम्ही कोणताही पूर्वग्रह मनात ठेवून जाणार नाहीये.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.