संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते।।
कर्मसंन्यास आणि कर्मयोग दोन्हीही मार्ग नि:श्रेयस्कर, म्हणजेच परम कल्याणकारी आहेत. मात्र, कर्मयोग हा कर्म संन्यासापेक्षा विशेष महत्त्वाचा आहे. बालमित्रांनो, कर्मसंन्यास श्रेष्ठ की कर्मयोग श्रेष्ठ? कोणता मार्ग निवडावा हा प्रश्न अर्जुनाला पडला आहे.
श्रीकृष्ण सांगतो, हे दोन्ही मार्ग मोक्षाकडे नेणारे परमकल्याणकारी आहेत. मात्र, संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे, कारण कर्मसंन्यास हा खूपच कठीण आणि कष्टदायक मार्ग आहे. संन्यासी कसा असतो? त्याला मिळेल ते खावे लागते.
आई, वडील, मुले, बाळे, सगळी सुखे सोडावी लागतात. रानावनात एकांतात राहून कठीण साधना करावी लागते. हे सर्व ईश्वरचिंतनात चित्तस्थिर राहावे म्हणून करावे लागते. घरात राहून मन एकाग्र होत नाही. अभ्यास करताना विद्यार्थ्यांना असा अनुभव नेहमीच येतो.
बरे, एवढे करून संन्यासी कठीण साधना, कष्ट सहन करू शकला नाही तर संसारात परत यावे लागते. मग धड संसार नाही आणि संन्यासही नाही, अशी विचित्र अवस्था होते. कर्मयोगाचे आचरण करणे त्यामानाने सोपे आहे.
कर्मयोगी समाजात वावरतो. घरातच राहतो. सगळ्या सुख सोयी अनुभवतो. सगळी कर्तव्ये उत्तम रीतीने पार पाडतो. हे सर्व करत असताना कर्मफल आपल्याला चिकटू न देण्याचे, कर्मबंधनात न पडण्याचे कौशल्य कर्मयोगी आत्मसात करतो. हे समजावून सांगताना श्रीकृष्ण कमळाच्या पानांचे उदाहरण देतात.
जो आपली सर्व कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो आणि कर्मफलाची आसक्ती सोडून देतो त्याला पाप चिकटू शकत नाही. कमळाच्या पानांना जसे पाणी चिकटत नाही, पापे त्याच्यापासून दूर राहतात. कर्मयोगी केवळ शरीराने, मनाने, बुद्धीने, इंद्रियांनी, आत्मशुद्धीसाठी कर्मे करतो. कर्मे करताना कर्तेपणा, मनात स्वार्थ असल्यास मनुष्य बंधनात अडकतो. निष्काम कर्मे करता करता चित्त शुद्ध होते, अज्ञान दूर होते, सत्याचा उलगडा होतो. सूर्य उगवल्यावर जसा अंधार नाहीसा होतो, तसा ज्ञानाचा प्रकाश बुद्धीला प्रकाशित करतो.
- श्रुती आपटे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.