Guru Purnima 2023 : आज गुरू पौर्णिमा आहे. गुरूला वंदन करण्याचा आजचा दिवस. तसे पहिली गुरू ही आपली आईच असते. तीच आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवते. मग नंबर येतो तो,आपल्या शिक्षकांचा. अगदी शाळेपासून उच्च माध्यमिक शिक्षकापर्यंत. त्यांनंतर येतात ते आयुष्याला कलाटणी देणारे गुरू.
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील ते बाप असतात. पण गुरूला काही शिष्य असेही भेटतात जे त्यांनाच गंडा घालतात. त्यांनाच फसवतात. राजकारणात तर या गोष्टी सर्रास घडताना दिसत आहेत. ज्या व्यक्तीच्या हातात हात घालून राजकारणाचा ‘र’ गिरवला. सत्तेसाठी त्याच व्यक्तीच्या विरोधात जाणं ही गोष्ट आता एवढी मोठी राहीलेली नाही.
नेत्यांच्या अशा वागण्यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. कोणाला गुरू म्हणावे अन् कोणाला शिष्य हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे. आज गुरू पौर्णिमेनिमित्त आपण राजकारणातील काही व्यक्तींनी त्यांच्या गुरूचीच कशी फजिती केली, गुरूलाच कोंडीत पकडले याचे काही किस्से पाहुयात.
आज गुरू पौर्णिमेनिमित्त आपण राजकारणातील दिग्गज नेते आणि त्यांचे गुरू यांच्याबद्दल जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांचे शिष्य होय. कधी काळी अडवाणी एक दिग्गज नेते होते तर, मोदी एक सामान्य कार्यकर्ता व संघाचे प्रचारक. पण मोदींनी अडवाणींना जवळ गेले व त्यांना गुरु मानत राजकारणातील एक-एक पायरी वर चढत गेले.
२०१३ मध्ये या गुरू शिष्यामध्येही वादाची ठिणगी पडली होती. जेव्हा गोव्यात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होती आणि तेथे 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्याचा संघाचा 'आदेश' होता. त्याला अडवाणी यांनी विरोध केला. तरीही मोदी यांची निवड झाली.
आणि असा विरोध केला, म्हणून अडवाणी यांच्या दिल्लीतील घराबाहेर निदर्शनंही घडवून आणण्यात आली. त्यानंतर भाजपच्या अनेक कार्यक्रमात अडवाणी यांना डावलण्यात आले.
अडवानींनी आपल्या शिष्याला कठिण प्रसंगी साथ दिली. आता गुरु-शिष्याचे नाते राहिले नाही. तर मोदीही या गुरूला विसरून गेले आहेत.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नारायण राणे
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नारायण राणे यांचे गुरू शिष्याचे नाते सगळ्यांनाच माहितीय. गुरूने शिष्याला मुख्यमंत्री पदावर नेऊन बसवलं. पण शिष्याने त्याची जाण न ठेवता थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर नारायण राणे यांनी पक्षाच्याच सभेतून जाहीर टीका केली. पक्ष नेतृत्वावर टीका केल्यामुळे नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, पण राणेंनी मात्र त्यांनी स्वतःच पक्ष सोडल्याचा दावा केला. त्या दरम्यानच्या काळात शिवसेना विरुद्ध राणे समर्थक हा राडा मुंबई आणि कोकणात सुरू होता.
2005 साली नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. पण तिथेही ते फार काळ टिकले नाही 2018 मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी स्वत:चा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' काढला पुढे 2019 मध्ये त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भाजपमध्ये विलीन केले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश सर्वच पहिल्या फळीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार हेही शरद पवारांचाच हात धरून राजकारणात आले. पण त्यांनीही गुरूच्या पाठीत खंजीर खुपसला. गुरू पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कालच (२ जुलै) काही आमदारांना घेऊन सत्तेत गेले आहेत.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद दिसू लागले.
या निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे यायला हवं होतं. परंतु, शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेसबरोबर बोलणी करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं आणि त्याबदल्यात दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद जास्तीचं घेतलं.
तेव्हापासून अजित पवारांनी वेळोवेळी शरद पवारांना विरोध केला आहे. अगदी जेव्हा शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजिनामा दिला, तेव्हा सगळे नेते कार्यकर्ते पवारांना समजावत होते. पण अजित पवार मात्र कार्यकर्त्यांनाच समजावत होते. हे अखंड महाराष्ट्राने पाहिलं आहे.
आणि त्यात काल अजित पवारांनी केलेलं कृत्य म्हणजे गुरू पौर्णिमेला शरद पवारांना दिलेली धक्कादायक भेटच म्हणावी लागेल.
धनंजय मुंडे आणि स्वर्गीय गोपिनाथ मुंडे
धनंजय मुंडे हे राजकारणातील एक आकर्षक व्यक्तीमत्त्व आहे. त्यांच्यात असलेले गुण हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यातूनच आले आहेत. २००२ मध्ये धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद लढवली, तेव्हा माझ्या वडिलांच न ऐकता गोपिनाथ मुंडेंचं ऐकलं आणि त्यांनी सांगितलेला मतदारसंघ निवडला असेही ते म्हणाले होते.
पण या शिष्यानेही गुरूच्या विरोधात जात अनेक गोष्टी केल्या आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे हयात असतानाच धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यापासून राजकीय फारकत घेतली. इथूनच गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा राजकीय संघर्ष दिसून आला. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाची धुरा आली. मात्र, याही काळात त्यांना धनंजय मुंडे यांच्यासोबत मोठा संघर्ष करावा लागला.
आमदार हसन मुश्रीफ आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक
कागल तालुक्याच्या वर्चस्ववादाच्या राजकारणातून दिवंगत मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात ९ डिसेंबर २००६ रोजी संघर्षाची ठिणगी पडली. त्यातून तालुक्यासह जिल्ह्याचे राजकारणच पूर्णपणे बदलले. हमिदवाडा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून या दोन नेत्यांमधील संघर्ष वाढतच गेला.
ग्रामपंचायतींपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्व ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. त्याला दोन्ही नेत्यांनी प्रोत्साहनच दिले. लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना पराभूत करण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी कंबर कसली.
तर विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांना पराभूत करण्यासाठी प्रा. संजय मंडलिकांसह दिवंगत सदाशिवराव मंडलिकांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. इतकेच काय तर माजी खासदार मंडलिकांच्या पश्चात ‘गोकुळ’च्या निवडणुकीतही त्यांनी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.