Relationship : "सुसंस्कृत होण्यासाठी संस्कारच महत्वाचे" क्षुल्लक कारणाने होतोय घटस्फोट पण फरफट होते आईवडिलांची..
प्रांजली गोसावी
स्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहिताना अनेक अनुभव येतात. दररोज फोन येतात, बायका आवर्जून भेटून बऱ्याच विषयांवर बोलतात. परवा असाच फोन वाजला. सकाळची घाई होतीच. घाईतच मी फोन घेतला. समोरून पंचावन्न-साठ वर्षांचे वय असणारा गंभीर आवज ऐकू आला.
‘अगं मी तुझा लेख वाचला. खूप छान वाटले.’
‘धन्यवाद काकू’ पण आपण कोण? अशी चौकशी करणार एवढ्यात त्याच म्हणाल्या, ‘तुला घाई असेल कामाची. म्हणून मी तुझा वेळ घेत नाही. पण तू एका विषयावर नक्की लिहिशील का?’ ‘कोणत्या?’ मी म्हणाली.
‘विचार न करता नवरा बायको एक झटक्यात वेगळे होतात गं! आणि त्याचा परिणाम मुलं आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्यांवर होतो.’ एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला.
सुखी संसाराच्या व्याख्येत कुटुंबव्यवस्थेला अतिशय महत्त्व आहे. भारताची ओळख येथील कुटुंबव्यवस्थेमुळे आहे. संयुक्त कुटुंब आज जगात केवळ आपल्या देशात दिसून येते. ज्यातून मुलांची निकोप वाढ होऊन भयमुक्त जीवन साऱ्यांनाच जगता येते.
पण, हल्ली नात्यातील तणावामुळे मनामनांत दुरावा निर्माण होत आहे. सर्वात मजबूत असलेले नवरा-बायकोचे नाते संवेदनशील आणि नाजूक होत आहे. आज या नात्यांमध्ये तणाव वाढत आहे. याची अनेक कारणे आहेत.
लग्न झाले की, नववधू सासरच्या लोकांना त्यांच्या बऱ्या-वाईट स्वभावाला स्वीकारत आयुष्याला सुरुवात करते. काही दिवसात सगळ्यांच्या स्वभावाची ओळख झाली की, सगळ्यांना ती आवडते.
कोणाबाबत तक्रार राहिली आणि माहेरी आल्यावर तिने तिची तक्रार आई-वडिलांना सांगितली तर ते तिला सांभाळून घेण्याचा सल्ला देतात. परंतु आज हे चित्र अपवादाने दिसते.
नवरी घरी आली की, ती मोबाईलवरून आई, बहिणीसोबत सतत कनेक्ट राहते. सासरची प्रत्येक गोष्ट माहेरी सांगण्याची घाई असल्याने तिचा अधिकाधिक वेळ मोबाईलवर बोलण्यात जातो. ही गोष्ट कुटुंबीयांना सारखी खटकते. परिणामी सुनेच्या माहेरचा हस्तक्षेप वाढतो आणि नात्यात तणाव निर्माण व्हायला सुरुवात होते.
आपली मुलगी सासरी गेली. तिला तिच्या संसारात रमू न देता कित्येक आई आपल्याच मुलीच्या भविष्याच्या शत्रू होतात. सोबतच दुसरीही बाजू समजून घ्यावी लागेल. एखादी मुलगी अनेक स्वप्ने घेऊन नवीन घरात पाऊल टाकते.
सासूला आई आणि नणंदेला बहीण समजायचे, अशी शिकवण तिला असते. पण, ही नवीन आई तिच्या मम्मीसारखी कधी वागत नाही. त्यामुळे तिची घुसमट होते. ही घुसमट व्यक्त करायला कोणी भेटले नाही तर चिडचिड वाढते. अशावेळी तिची आई तिची मैत्रीण होऊ शकते.
मोबाईल दुसरा घटक आहे जो नात्यांमध्ये दुरावा आणि संशय निर्माण करतोय. शक्यतो नवरा-बायकोमध्ये खाजगी असे काही असूच नये. जे आहे ते उघड आणि स्पष्ट असावे. कारण हे नातं खूप संवेदनशील असतं. मित्र, मैत्रिणी असणे हा सामान्य भाग असला तरी त्यांना कुठपर्यंत प्रवेश आणि किती वेटेज असावे? याला मर्यादा असणे आवश्यक आहे.
घरी तापाने फणफणणाऱ्या नवऱ्याला सोडून भिशी, पार्टी किंवा मित्र-मैत्रिणीसोबत डेटिंगवर जाणाऱ्या बायकोविषयी आत्मीयता राहात नाही. हेच नवऱ्यांच्या बाबतीतही आहेच.
नवरा काळजी घेणारा नसला, व्यसनी, खोटे बोलून फसविणारा असला की मनभेद व्हायला वेळ लागत नाही. कितीतरी नाती केवळ या कारणांनी तुटलेली मी पाहिली आहेत.
दोष कुण्या एकाचा नसतो. संसारातील या दोन्ही घटकांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी दोघांजवळ संयम असावा लागतो. परंतु सध्या तोच कुणाकडे दिसत नाही. (Relationship Tips)
क्षुल्लक कारणांनी विभक्त झालेले नवरा-बायको केवळ ते दोघेच विभक्त होत नाही तर त्यांच्या या कृतीने मुलांची आणि घरातील ज्येष्ठ नागरिकांची फरफट होते.
नात्यापेक्षा पैशाला दिलेले महत्त्व, जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा, तिसऱ्या घटकाचा हस्तक्षेप, अनैतिकता अशी आणि इतरही बरीच कारणे घटस्फोटासाठी कोर्टाची पायरी चढायला भाग पाडत आहेत. (lifestyle)
जिथे पावला पावलावर संघर्ष करावा लागणार आहे, अशा जगात वावरताना कुटुंब व्यवस्थाच मुलांसाठी आणि घरातील ज्येष्ठांसाठी भक्कम आधार होऊ शकते.
शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो; पण सुसंस्कृत होण्यासाठी संस्काराची गरज असते. कुटुंब व्यवस्था चांगली चालावी, असे वाटत असेल तर घरातील लहान्यांवर नाते टिकविण्याचे संस्कार होणे आवश्यक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.