
A beautifully decorated torana made of fresh mango leaves hanging at the entrance, symbolizing prosperity and positive energy during festive celebrations.
esakal
Diwali Special Door Toran : सध्या सणासुदीचा काळ आहे, नवरात्र-दसरा पार पडले आहेत आणि आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. प्रत्येकाच्या घरात सजावटीची तयारी सुरू झाली आहे. दिवे, रांगोळीसह सणाच्या दिवशी घराच्या दारावर आंब्याच्या पानांचं तोरण बांधण्याची भारतीय परंपरा आहे. या दिवशी जवळपास सर्वचजण दारावर तोरण बांधतात, अनेकजण रेडीमेड तोरण बाजारातून आणतात, तर कित्येकजण आंब्याची पान आणून पारंपारिक पद्धतीनेच तोरण बांधतात.
आंब्याच्या पानांपासून बनवलेले तोरण केवळ सुंदरच दिसत नाही तर त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. पण या तोरणामध्ये नेमकी किती आंब्याची पानं लावावीत याबाबत बहुतेक जणांना माहिती नाही. दारावर बांधल्या जाणाऱ्या आंब्याच्या पानांच्या तोरणाबाबतही शास्त्रानुसार काही नियम आहेत. किती पानं लावणं शुभ आणि किती पानं लावू नयेत याबाबत माहिती दिलेली आहे.
अशी माहिती समोर आली आहे की, वास्तुशास्त्र आणि हिंदू श्रद्धेनुसार, जर तुम्ही पानांच्या संख्येकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला अनवधानाने शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम अनुभवायला मिळू शकतात, ज्यामुळे घराच्या सुख आणि समृद्धीवर विपरीत परिणाम होवू शकतो.
आंब्याच्या पानांना सकारात्मक उर्जेचे आणि संपत्तीची देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की तोरण घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश रोखते आणि शुभ शक्तींचे स्वागत करते. म्हणून, जेव्हा आपण तोरण बनवतो तेव्हा पानांची योग्य संख्या असणे महत्वाचे आहे जेणेकरून या शुभ शक्ती पूर्णपणे सक्रिय होतील.
वास्तुशास्त्रानुसार, दिवाळी तोरणात आंब्याची पाने विषम संख्येत वापरावीत. ही संख्या ५, ७ किंवा २१ असू शकते. ही आनंद आणि सौभाग्यकारक मानली जाते. तुम्ही ३ पानांचा गुच्छ बनवून तोरण देखील बनवू शकता. ७ किंवा ११ पाने सर्वात शुभ मानली जातात, म्हणून तुम्ही त्या संख्येची पानेही तोरणात वापरू शकता. तर तोरण बनवताना दोनच्या पटीत म्हणजेच २, ४, ६, ८, १०...इत्यादी संख्या असलेली पाने वापरणे टाळावे. कारण, हे अशुभ मानले जाते.