Satej Patil Kolhapur : भाजपला रोखण्यासाठी मित्रपक्षांना झुकते माप

काँग्रेस पक्षात नेत्यांची गर्दी असली तरी नव्या पिढीतील आश्वासक नेते म्हणून सतेज पाटील यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. सध्या ते विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप, काँग्रेसची स्थिती, भाजपचे आव्हान यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.
Satej Patil Kolhapur
Satej Patil Kolhapursakal

काँग्रेस पक्षात नेत्यांची गर्दी असली तरी नव्या पिढीतील आश्वासक नेते म्हणून सतेज पाटील यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. सध्या ते विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप, काँग्रेसची स्थिती, भाजपचे आव्हान यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.

-विजय चोरमारे

प्रश्नः कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दावा असतना ती तुम्ही काँग्रेसला कशी मिळवली ?

उत्तरः कोल्हापूरची जागा आम्ही काही भांडून घेतलेली नाही. लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे. विधानसभेचे तीन आमदार आणि विधान परिषदेचे दोन आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे येणे नैसर्गिक न्यायाला धरून होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासारखे उमेदवार असल्यामुळे सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यांच्या उमेदवारीचा आघाडीलाच लाभ मिळणार आहे.

पण कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे आल्यामुळे सांगलीचा प्रश्न निर्माण झाला, त्याबाबत आपले मत काय?

-मुळात तसा संबंध जोडणेच चुकीचे आहे. शाहू महाराज उभे राहतील त्या पक्षाला कोल्हापूरची जागा द्यायची, असा विषय होता आणि शाहू महाराजांनी काँग्रेसकडून उभे राहण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली असा विषय कधीच नव्हता. शिवसेनेला हातकणंगलेची जागा दिलेलीच होती आणि तिथे ते लढताहेत, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला संधी नव्हती असे म्हणता येत नाही.

Satej Patil Kolhapur
Rahul Gandhi : शेतकरी अन् तरुणांचे कुणीच ऐकत नाही ; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

राज्यपातळीवर काँग्रेसने जागावाटपात दुय्यम स्थान घेतल्याचे दिसून येते.

-महाविकास आघाडीचे जागावाटप जिंकून येण्याच्या शक्यतेच्या आधारे झालेले आहे. विदर्भात काँग्रेसची चांगली ताकद आहे, तिकडच्या बहुतेक जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. मुंबईत काँग्रेसला तीन जागा मिळायला हव्या होत्या. तिथे फक्त एक जागा मिळाली आहे. शिवाय सांगली आणि भिवंडीच्या जागेवर आमचा दावा होता त्या जागा मिळू शकल्या नाहीत. काँग्रेस हा आघाडीतील एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे आणि देशपातळीवर इंडिया आघाडी भक्कम करण्याची जबाबदारी काँग्रेसवर आहे. भाजपला रोखण्याची जबाबदारी काँग्रेसवर आहे. मित्रपक्षांना झुकते माप देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली याचा अर्थ काँग्रेस कुणापुढे नमली असा होत नाही. भाजपला रोखण्यासाठी केलेली ती व्यूहरचना आहे.

जागावाटपातील मतभेदानंतर तिन्ही पक्ष एकत्रितपणे प्रचाराला सामोरे जाऊ शकतील का?

-एकत्रित प्रचारामध्ये काही अडचणी येण्याचे कारण नाही. तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्या मनासारख्या घडणार नाहीत. तरीसुद्धा आम्ही सहमतीने जागावाटप केले आहे. तीन जागांचा विषय हा फार मोठा नाही. आम्ही ४५ जागा सहमतीने ठरवल्या आहेत, ही मोठी गोष्ट आहे. जे किरकोळ मतभेद होते ते गुढी पाडव्याच्या दिवशी निकालात काढून पुढे जाण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे.

काँग्रेसची राज्यातील परिस्थिती कशी आहे?

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेसची विश्वासार्हता तिप्पट वाढली आहे. काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, तो वाचल्यानंतर प्रत्येक घटकाला फक्त काँग्रेसच न्याय देऊ शकते हे लक्षात येऊ शकेल. लोकांनाही ते लक्षात येऊ लागले आहे त्यामुळे काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठीही चांगले परिणाम बघायला मिळतील.

महाराष्ट्रातले काँग्रेसचे वैभव परत मिळवण्याची सुरुवात म्हणून या निवडणुकीकडे पाहता का?

-देशात २०१४ आणि २०१९ला वेगळे वातावरण होते. केंद्रातील सरकारला दहा वर्षे झाल्यानंतर भाजपचे खरे रूप आता जनतेच्या लक्षात आले आहे आणि काँग्रेसच बरी अशी लोकांची धारणा बनली आहे. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस ताकदीने निवडणुकीला सामोरी जात आहे. सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून काँग्रेस मैदानात उतरली आहे. कोल्हापुरात मी, लातूरला अमित देशमुख, सोलापूरला प्रणिती शिंदे, धुळ्याला कुणाल पाटील, मुंबईत वर्षा गायकवाड, नागपूरला सुनील केदार, अमरावतीला यशोमती ठाकूर यांच्यासह ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सक्रीय आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे अनुभवी नेते आमच्या प्रचार समितीचे प्रमुख आहेत. सगळे कामाला लागले आहेत. असे चित्र २०१९ साली नव्हते, त्यामुळे निश्चितच काँग्रेसला चांगले यश मिळेल.

भारतीय जनता पक्षाचे आव्हान कितपत गंभीर वाटते?

-समोर भाजप असल्यामुळे आव्हान मोठे आहेच. परंतु भाजपकडून ज्या ‘चारशे पार’च्या वल्गना केल्या जात आहेत, त्याला अर्थ नाही. कोणत्याही परिस्थितीत भाजप २१४ च्या पुढे जात नाही. महाराष्ट्रात तर त्यांना फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. त्यांच्याकडे आत्मविश्वास नाही, म्हणून तर महाराष्ट्रातल्या निवडणुका पाच टप्प्यात घेत आहेत. आत्मविश्वास असता तर एका टप्प्यात निवडणुका घेतल्या असत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com