उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये रिपब्लिकन पक्ष एकही जागा लढणार नाही. भाजपला पाठिंबा देणार आहे.
सांगली : ‘‘वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीत जातील, असे वाटत नाही. ‘भारत जोडो’ यात्रेच्या समारोपास ते गेले होते. ते मोदींच्या विरोधात असले तरी मी मोदींसमवेत आहे. आंबेडकरी समाजासाठी मोदींनी केलेल्या कामामुळेच त्यांच्यासमवेत गेले पाहिजे. त्यामुळे आंबेडकर ‘माविआ’ समवेत जाणार नाहीत. त्यांना ते घेणारही नाहीत,’’ असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
दरम्यान, ‘‘रिपब्लिकन पक्ष राज्यात शिर्डी व सोलापूर येथील जागेसाठी आग्रही आहे. आम्ही मागणी केली असून जागा मिळाल्या नाहीत, तर वेगळा विचार केला जाईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. आठवले (Ramdas Athawale) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आठवले म्हणाले, ‘‘राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेचा काँग्रेसला लाभ होणार नाही. लोकप्रियता कशी वाढवावी, हे केवळ नरेंद्र मोदी यांनाच जमते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये रिपब्लिकन पक्ष एकही जागा लढणार नाही. भाजपला पाठिंबा देणार आहे. या वेळी ४०० पार नारा दिला आहे. एनडीएच्या ४०० हून अधिक व भाजपच्या ३७० हून अधिक जागा निवडून येतील. नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ-सबका विकास’ म्हणत याआधीच भारत जोडला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची आवश्यकता नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात समारोप झाला आहे.
महाराष्ट्रात नवीन रस्ते, महामार्ग, सोयी-सुविधा झाल्या आहेत. ८० लाख गरीब नागरिकांना पुढील पाच वर्षे मोफत धान्य देण्यात येणार आहे. त्यांचा लाभ सर्व जाती- धर्माच्या लोकांना होणार आहे. शिर्डी व सोलापूर जागेसाठी इच्छुक आहोत. दोन जागा निवडून आल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळेल. आमची ताकद वाढेल. आमचा विचार करावा, अशी मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पक्षाचा विचार करताना एका व्यक्तीचा न करता पक्षाचा विचार करावा. कर्नाटकातील हेगडे यांच्या भूमिकेचा व भाजप, नरेंद्र मोदी यांचा काही संबंध नाही. आता भाजप बदलला आहे. हेगडे नेहमीच विपर्यस्त भूमिका मांडत असतात. संविधान कोणी बदलू शकत नाही.’' प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, सुरेश बार्शीकर, सूर्यकांत वाघमारे, जगन्नाथ ठोकळे, अरुण आठवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आमचा पक्ष महायुतीत आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी महामंडळाची नियुक्ती करावी. स्थानिक पातळीवर ‘डीपीडीसी’सह अन्य ठिकाणीही नियुक्त्या केल्या जाव्यात. यासाठी आग्रही असल्याचे आठवले यांनी सांगितले.