Nashik Lok Sabha: भुजबळांची माघार; भाजपचा ‘माधव’ फॉर्म्युला गंडणार? ५ मुद्दे...

Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभा मतदारसंघ... धार्मिक-सांस्कृतिक, साहित्यिक संदर्भ, कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं अग्रेसर, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला असा नाशिक लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक आहे.
Why did Chhagan Bhujbal withdraw from the election
Why did Chhagan Bhujbal withdraw from the electionesakal

Nashik Lok Sabha:

मी नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे... असं छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आणि राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या सगळ्या चर्चांना एकवेळ पूर्णविराम लागला. त्या चर्चा म्हणजे नाशिकचा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला का शिंदेंच्या शिवसेनेला... त्यामुळे आता एकतर स्पष्ट झालं आहे की नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचा शिलेदारच लोकसभेच्या रिंगणात उतरेल. कारण, भुजबळांनी माघार घेताच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट, भरत गोगावलेंनीही त्यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं. तर तिकडे नाशिकचे विद्यमान खासदार आणि शिंदे गटाकडून प्रबळ दावेदार असणाऱ्या हेमंत गोडसेंनी थेट त्र्यंबकेश्वर गाठलं. त्यामुळे आता अजय बोरस्ते की गोडसे? देव कुणाला पावणार? हे तर येत्या काळातच कळेल. तरी, भुजबळांनी लोकसभेतून माघार का घेतली? भुजबळांनी माघार घेतल्यामुळे भाजपचा माधव फॉर्म्युला गंडला का? हे जाणून घेऊयात-

नाशिक लोकसभा मतदारसंघ... धार्मिक-सांस्कृतिक, साहित्यिक संदर्भ, कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं अग्रेसर, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला असा नाशिक लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक आहे. मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावर महायुतीतल्या तीनही राजकीय पक्षांनी दावा केला होता.

मध्यंतरी रणजीत सावरकरांनीही नाशकात जाऊन महंत अनिकेत शास्त्रींसारख्या व्यक्तीनं संसदेत जाण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. पण पुढे भाजपनं या मतदारसंघावरचा दावा सोडला अन् कुठेतरी अजितदादांना पाठबळ देत शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपापसात चर्चा करुन तोडगा काढण्याची भूमिका घेतली. पण, यातही भाजपचा कुठेतरी राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याची चर्चा होती अन् तेच आज भुजबळांनीही पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं. पण, भुजबळांनी माघार का घेतली, त्याचे ५ मुद्दे आपण समजून घेणार आहोत.

१. नाशिक- शिवसेनेचा बालेकिल्ला

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा २०१४ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. १९६७ आणि १९७१ मध्ये भानुदास कवडे आणि २०१४, २०१९ मध्ये हेमंत गोडसे हे दोघेच सलग दोनदा संसदेत खासदार म्हणून निवडून गेलेत. कारण, या मतदारसंघानं कधीच एका पक्षाला डोक्यावर घेतलेलं नाही. वेळोवेळी इथल्या जनतेनं आपला लोकप्रतिनिधी जिथे चुकला तिथेच त्याला थांबवला अन् नव्याला संधी दिली आहे. म्हणजे मनसेसारख्या पक्षालाही नाशिककर जनतेनं महापालिका ताब्यात दिली होती. तर, २००९ ला मनसेचा उमेदवार फक्त २० हजाराच्या फरकानं पराभूत झाला होता. तरी, शिवसेनेबाबत सांगायचं झालं, तर मागील १० वर्षांपासून इथे शिवसेनेची सत्ता आहे. पण, शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार हेमंत गोडसेंनी शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर आता ही जागा मिळवण्यासाठी शिवसेनेला मोठी पराकाष्ठा करावी लागत असल्याची चर्चा आहे.

२. शिवसैनिकानं भुजबळ काका-पुतण्याचा केला पराभव

खरंतर हेमंत गोडसे २०१४ साली जेव्हा पहिल्यांदा नाशकातून खासदार झाले, त्यावेळी त्यांनी खुद्द छगन भुजबळांना एक लाख ८७ हजार मतांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर २०१९ ला त्यांनी भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांना दोन लाख ९२ हजार मतांनी पराभूत केलं होतं. आणि २००९ साली जेव्हा गोडसे मनसेत होते त्यावेळी जवळपास २२-२४ हजाराच्या मताधिक्यानं त्यांचा समीर भुजबळांनी पराभव केला होता. त्यानंतर मात्र, २००९ सालच्या पराभवाचा बदला या शिवसैनिकानं २०१४ आणि २०१९ ला घेतला. मोदी लाटेत शिवसेनेची नय्या पार झाली अन् इथून दोन्ही वेळा गोडसेच निवडून आले.

Why did Chhagan Bhujbal withdraw from the election
NCB : एनसीबीचे उच्चपदस्थ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांची मुख्य दक्षता अधिकारी पदावरून हकालपट्टी

३. ओबीसी नेते म्हणून वाहवा पण मराठा समाजाचा रोष

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे जेव्हा उपोषण करत होते, त्यावेळी त्यांच्या प्रती सरकारनं उचललेल्या पावलांवर मंत्री असूनही भुजबळांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली होती. शिवाय, भुजबळांचं जरांगेंशी सुरु असलेल्या शाब्दिक द्वंद्वानं राज्यभरात मराठा समाजाचा भुजबळांप्रती रोषही दिसून आला होता. मराठा आरक्षणावर भुजबळ उघड उघड जरांगेंच्या मागणीविरुद्ध भूमिका घेत होते. शिवाय मंत्रिपदाचा राजीनामा देत ओबीसी मेळावे घेतल्यानं त्यांच्यावर विरोधकांकडूनही आरोप करण्यात आले. मंत्रिमंडळात बोलता येत नाही, म्हणून भुजबळ सभांमधून बोलतात असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे एकप्रकारे ओबीसी नेते म्हणून भुजबळांनी वाहवा मिळवली पण जरांगेंवर आरोप केल्यानं मराठा समाजाचा रोषही ओढवून घेतला.

४. भाजपला भुजबळ का हवे होते?

भुजबळांप्रमाणेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी केलेल्या आंदोलनामुळे भाजपला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागलं. असं असूनही भाजप भुजबळांसाठी का आग्रही होतं? तर त्याला कारण म्हणजे भाजपचा माधव फॉर्म्युला.. म्हणजे भारतीय जनता पक्षाने प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांच्या काळात आपला सामाजिक पाया विस्तारला. तो माळी-धनगर-वंजारी समाजाच्या मतांचा ‘माधव’ फॉर्म्युला यंदाही परत आणण्याचे भाजपचे प्रयत्न होते.

एकीकडे अशातच, भाजपने ओबीसी समाजघटकांचं संघटन सुरू केलं. त्याचाच एक भाग म्हणून वंजारी समाजात मान्यता असलेल्या पंकजा मुंडेंना बीडमधून आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी देण्यात आली. आणि त्याचवेळी छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देऊन माळी समाजाला लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू होते.

५. भाजपची खेळी, अजितदादांवर नाराजी?

खरंतर, भुजबळांबाबत सांगायचं झालं तर, त्यांना शिवसेनेचा विरोध होताच पण स्थानिक भाजप नेत्यांचाही विरोध होता. त्यामुळे भुजबळांच्या पराभवाची कल्पना असतानाही भाजपचं केंद्रीय नेतृत्व मात्र भुजबळांच्या उमेदवारीसाठी आग्रही होतं. अमित शाह-मोदीच नावासाठी आग्रही असल्यामुळे भुजबळांनाही उमेदवारीला नकार देता येत नव्हता. म्हणजे आज भुजबळांनी पत्रकार परिषदेतही सांगितलं, ते आपल्या पुतण्यासाठी आग्रही होते पण मोदी-शाहांनी भुजबळांचं नाव घेतल्याचं नमूद करत त्यांनी त्यांचे आभार मानले.

अन् नाशिकच्या जागेबाबत पक्षनेतृत्वाकडून अधिकृत घोषणा होत नसल्यानं आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने माघार घेतली असल्याचं भुजबळांनी म्हटलं. त्यामुळे भुजबळ अजितदादांवर नाराज असल्याची चर्चाही दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात आहे. तरी, मी माघार घेतली म्हणजे राष्ट्रवादीची माघार नाही, असंही भुजबळांनी म्हटलंय. त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादीकडून यावर दावा सांगितला जाणार की? शिंदेंच्या शिवसेनेलाच ही जागा मिळणार? हे पाहणं महत्वाचं असेल.

Why did Chhagan Bhujbal withdraw from the election
Raigad Lok Sabha: सुनील तटकरेंना लढत कठीण, अनंत गीतेंचे काय? रायगड लढतीत चुरस वाढली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com